लाडक्या विठुरायासाठी त्याचे भक्त काय करतील सांगता येत नाही. नुकतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातील वारकरी या विठ्ठलाच्या दर्शनासाठी कित्येक मैल पायी चालत आले होते. त्यानंतर आता या भक्तांनी विठूरायावरील आपली भक्ती व्यक्त कऱण्यासाठी एक आगळीवेगळी गोष्ट केली आहे. अखंड दर्शन देऊन विठ्ठल थकला असल्याने त्याला आलेला शीण दूर व्हावा अशी त्यांची भावना होती. यासाठी एका भक्ताने विठ्ठलाला एक दोन किलो नाही तर दोन ट्रक भरुन फुलांनी सजवले आहे. त्यामुळे पंढरपूरचे मंदिर फुलांनी सजल्याचे दिसत आहे. काल रात्रभर जागून या भक्ताने विठ्ठल मंदिराचा गाभारा, रुक्मिणी मंदिराचा गाभारा, सोळखांबी आणि सभामंडप अशी सर्व ठिकाणे अतिशय उत्तम पद्धतीने सजवली आहेत. आपल्या लाडक्या विठूरायाला प्रसन्न वाटावे आणि दर्शन देऊन थकलेला तो ताजातवाना रहावा यासाठी हा खटाटोप करण्यात आला आहे. रंगीबेरंगी अशा या फुलांचा वापर सजावटीसाठी केल्याने मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. या सजावटीसाठी वेगवेगळ्या रंगांची पानेही अतिशय कल्पकतेने वापरण्यात आली आहेत. आषाढी एकादशीला मंदिर वारकऱ्यांनी सजले होते तर आज ते फुलांनी सजल्याचे पहायला मिळत आहे. अशाप्रकारे अनेकदा विविध कारणांनी भक्तांकडून मंदिराची सजावट केली जाते. मात्र आताचे कारण हे अतिशय वेगळे आणि खास असल्याचे पहायला मिळत आहे.