केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं असून शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावं लागेल असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

“शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात,” रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य

“सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंनी काय म्हटलं आहे –
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.