शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप झालेले होते. आर्थिक गुन्हे विभागाच्या या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मोठ्या नेत्यांवर टीकास्र डागलंय. ते आज (२ मार्च) सकाळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. "फडणवीसांची जीभ अडखळत असेल तर." संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. अजित पवार यांच्यावर आरोप असलेला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, २५ हजार कोटींचा शिखर बँकेचा घोटाळा यावर फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे. या घोटाळ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांची जीभ अडखळत असेल तर हाच प्रश्न भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना विचारायला पाहिजे. नड्डा यांनादेखील या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हाच प्रश्न देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारला पाहिजे. शाहदेखील या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर याच प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे. भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणा नाही, अशा वल्गना मोदी करत होते. "फडणवीस लोकांशी खोटं बोलत आहेत" "देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. नवाब मलिक यांच्या बाजूला आम्ही अजित पवार यांनाही तुरुंगात पाठवू असे फडणवीस सांगत होते. आता अजित पवार आणि नवाब मलिक हे दोन्ही लोक भाजपाबरोबर आहेत. याबाबत फडणवीसांना विचारलं पाहिजे. फडणवीस लोकांशी खोटं बोलत आहेत. देशाशी, राज्याशी ते खोटं बोलत आहेत," अशी टीकाही राऊत यांनी केली. "निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही" "लोकसभा निवडणुकीआधी धर्म, जात, धार्मिक स्थळ यांचा वापर करता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. निवडणूक आयोग 'मोदी शाह कमिशन' झालंय. आम्ही सर्वजण नियमांचं पालन करणार आहोत. मात्र भाजपाचे दोन-चार लोक नियमांना फाट्यावर मारतात. कर्नाटकच्या निवडणुकीत हे पाहायला मिळालं," असं मत राऊत यांनी व्यक्त केले.