सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना मुरुड येथे घडली आहे. अभिजित प्रकाश पवार असे या तरुणाचे नाव आहे. अभिजीत सातारा जिल्ह्य़ातील खंडाळा तालुक्यातून आपल्या मित्रांसमवेत मुरुड येथे पर्यटनासाठी आला होता. जंजिरा किल्ल्यासोबत फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून तो दरीत पडला. मुंबई येथे सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. याची पुनरावृत्ती रविवारी रायगड जिल्ह्य़ात झाली. किल्ल्यासोबत सेल्फी काढण्याच्या नादात एका पर्यटकाने आपला जीव गमावला. खंडाळा तालुयातील शिरवळ येथे राहणारे पाच मित्र मुरुड जंजिरा फिरावयास आले होते. राजपुरी येथे किल्ला पाहावयास जात असताना वाटेतच डोंगरी येथे जंजिरा किल्ल्याचे छायाचित्र काढण्याचा मोह या पर्यटकांना झाला. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली गाडी थाबवून एका ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी अभिजित प्रकाश पवार हे एका दगडावर उभे राहून स्वत:चा सेल्फी काढण्यासाठी उभे राहिले. परंतु पाऊस झाल्याने दगड निसरडे झाले होते. याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून ते खडकाळ भागात जाऊन पडले. खूप खोलगट अंतर असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मित्रांनी त्यांना त्वरित रुग्णालयात आणले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.