शिर्डीमधील भिका-यांचे खून करणा-या सीरिअल किलरने आणखी १२ भिका-यांच्या खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली. पंढरपूर व कोल्हापूर येथे हे खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे या सीरिअल किलरने आतापर्यत १८ खून केल्याचे निष्पन्न होत आहे.
सतीश रामदास वैष्णव (रा. औरंगाबाद) हा सीरिअल किलर सध्या पोलीस कोठडीत असला तरी त्याला टॉयफाईड झाल्याने नाशिकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथेच त्याने ही कबुली दिल्याचे समजले. त्याच्या कोठडीची मुदत उद्याच संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयापुढे हजर केले जाईल. यासंदर्भात तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला, मात्र उद्या न्यायालयापुढे त्याचा कबुलीजबाब नोंदवला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या दोन जुलै रोजी शिर्डीत प्रारंभी दोन भिका-यांची व नंतर पंधरा दिवसांनी पुन्हा ४ भिका-यांची हत्या झाल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून सतीश याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते, परंतु रेल्वे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. नंतर शिर्डी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून तपास केला, त्यात त्याने शिर्डीतील भिका-यांच्या हत्येची कबुली दिली. आता पंढरपूर व कोल्हापूर येथेही त्याने भिका-यांची हत्या केल्याची कबुली दिल्याने ही संख्या किती वाढणार, या शंकेने पोलीस चक्रावले आहेत.