“मंदिरं उघडा या विषयावर जे काही राजकारण केलं गेलं, त्यावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं, त्यावेळी क्षुद्र राजकारण करणं योग्य नसतं. पण ठिक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही,” असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

भाजपाचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. “महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार सुरू आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्या पध्दतीने पाठिंबा मिळतोय, तो पाठिंबा मिळाल्याच्यानंतर जे काही नैराश्य आले त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे. तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे,” असं शरद पवार म्हणाले.

आणखी वाचा- कार्यकर्ते, आमदारांमध्ये चलबिचल नको म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय – अजित पवार

‘आघाडी सरकार बेईमान सरकार आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्याला उत्तर देताना पवार म्हणाले,”सत्ता गेल्यानंतर त्रास होतो मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द सामान्यपणे न वापरणारेही वापरायला लागतात. त्यामुळे ते गांभीर्याने घेवू नये.”

“त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठिक आहे त्याच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल. सत्तेचा गैरवापर आपल्या विचारांशी जे लोक नाहीत त्यांच्याविरोधात वापरायची ही पद्धत याठिकाणी सुरू झालीये यापेक्षा काही वेगळं नाही,” असं भाष्य शरद पवार यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या कारवाईवर केलं.

आणखी वाचा- लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल; रावसाहेब दानवेंचा दावा

“दानवेंचा हा गुण माहिती नव्हता”

“रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्‍यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचं चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहीत नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे, तर तसं होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणुस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचं काही चालत नाही,” असा चिमटा शरद पवार यांनी दानवेंना काढला.