लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. बारामतीत नणंद विरूद्ध भावजय अर्थात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार विजय शिवतारे हेही लोक सभा लढवण्याच्या तयारीत आहेत. विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढत महायुतीचे काम करण्याचा सल्ला दिला असल्याचे बोलले जाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतरही विजय शिवतारे यांनी मतदारसंघातील लोकांचा कल जाणून घेण्यासाठी भोर, वेल्हे असा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यादरम्यान विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर टीका केली. "५० वर्षांत पवारांनी जे केले नाही, ते पाच वर्षात करून दाखवणार", असे सूचक विधान विजय शिवतारे यांनी केले. हेही वाचा : “वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, “एकट्या काँग्रेसला…” विजय शिवतारे काय म्हणाले? "बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करत विश्वसात घेत आहे. जनतेची भावना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावनादेखील जनतेला कळवणे महत्वाचे आहे. यानंतर शेवटी ते काय निर्णय देतील हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांचा निर्णय महत्वाचा असला तरी जनतेचाही निर्णय महत्वाचा आहे. सहा लाखांपेक्षा जास्त मतदान पवारांच्या बाजूने आहे, तर पाच लाख मतांपेक्षा जास्त मतदान पवारांच्या विरोधी आहे. मग जे त्यांना मतदान करू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी लोकशाहीत अशी संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे, यासाठी सर्वांची तशी इच्छा आहे", असे विजय शिवतारे यांनी सांगितले. दुसरे कोणी प्रतिनिधित्व करू शकत नाही का? "महायुतीचे सरकार आले तेव्हा अनेक मतदारसंघातील विकासकामांच्या निधीवर स्थगिती होती. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून भोरच्या विकासकामांची स्थगिती उठवली होती. लोकांचे काम झाले पाहिजे, यासाठी धडपडणारे आम्ही आहोत. पवारांनी आम्हाला ४१ वर्ष पुन्हा-पुन्हा का मतदान करायला लावावं. बारामतीत दुसरे एखादे नाव नाही का? येथे हजारो दुसरी लोक आहेत. मग ते का नको? या मतदारसंघातील दुसरे कोणी प्रतिनिधित्व करू शकत नाही का? बारामती पश्चिमच्या भागात पिण्यासाठी पाणी नाही. मग ५० वर्षात तुम्ही काय विकास केला? मी तुम्हाला सांगतो मी योजना आखली आहे, ५० वर्षात जे यांना (पवारांना) झाले नाही ते विजय शिवतारे पाच वर्षांत करून दाखवणार, बारामतीच्या पश्चिम भागातील दोन लाख २९ गावातील लोकांना पाणी देईल", असे शिवतारे म्हणाले. अजित पवारांबाबत मतदारसंघात नाराजी "अजित पवार यांच्याबाबत प्रत्येक मतदारांची नाराजी आहे. मतदार स्वत: सांगत आहेत, आम्ही नोटाला मतदान करणार, पण यांना मतदान करणार नाही, अशी भावना मतदारांची आहे. अजित पवारांनी आपल्याला फोन केला नाही आणि त्यांच्याकडून काही अपेक्षाही नाही. पवार ही एक प्रवृत्ती आहे. पवारांच्या विरोधात नाही, तर पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण आहे. ज्यांनी पूर्ण सहकार, बँका, दूध संघ, विकास सोसायट्या ताब्यात ठेवून लोकांना दहशतीखाली ठेवले, ती प्रवृत्ती मोडली पाहिजे. लोकशाहीत ते चांगले नाही", असे विजय शिवतारे म्हणाले.