दहावीच्या परीक्षेत नववीच्या गणितातील १६ गुणांचे प्रश्न इयत्ता दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेत नववीच्या अभ्यासक्रमातील १६ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे गणिताची भीती वाटणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित सहज सुटणार आहे. दहावीचा गणिताचा अभ्यासक्रम भाग १ आणि भाग २ असा विभागला आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेतील ८० गुणांपैकी जवळपास १६ प्रश्न नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या गणिताचा अभ्यास करताना नववीच्या गणिताचीही थोडी उजळणी करावी लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणितातील जवळपास २०० ते २२५ उदाहरणे कमी झाली आहेत. त्यामुळे दहावीचे गणित तुलनेने सोपे झाले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचा गृहपाठ कमी होईल, अशी माहिती गणिताचे अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी दिली. ‘दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील २० टक्के गुण हे नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा नववीच्या गणिताचा अभ्यास चांगला असेल, त्यांना दहावीचे गणित तुलनेने सोपे जाईल. विद्यार्थ्यांना दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ६४ गुणांची प्रश्नपत्रिका असेल. मात्र, नववीतील प्रश्न विचारले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी निष्काळजी राहू नये. गणिताचा अभ्यास काळजीपूर्वकच करावा लागेल. गृहपाठ कमी झाल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला अधिक वेळ मिळेल. शिक्षकांनीही दहावीचे गणित शिकवताना नववीच्या गणिताचीही उजळणी करून घेणे आवश्यक आहे,’ असेही गोरे यांनी स्पष्ट केले. पुणे विभागाचा निकाल चांगला लागू शकतो गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभाग राज्यात अव्वल ठरत आहे. मात्र, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी थोडे अधिक नियोजन केल्यास पुणे विभागाचा निकाल कोकण विभागापेक्षा अधिक चांगला लागू शकतो. शैक्षणिक वर्षांच्या दुसऱ्या सत्रात केवळ पाच आठवडय़ांच्या तासिका मिळणार आहेत. त्यामुळे शिक्षकांनी ७५ टक्के अभ्यासक्रम पहिल्या सत्रात पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही पहिल्या दिवसापासून स्वयंअध्ययन, गृहपाठ केल्यास त्यांना अभ्यासक्रमाचे आकलन व्यवस्थित होईल, असेही गोरे यांनी सांगितले.