महाराष्ट्रात करोना संसर्ग झालेले एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आहा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज राज्यात २ हजार ८४० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ९८ लाख ४७ लाख ४७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ५२ हजार ५०९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९१ हजार १० व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर ५ हजार ३६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ८१ हजार ९२५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज महाराष्ट्रात २ हजार ८४० नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या ६८ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित पाच मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे पाच मृत्यू नाशिक-२, लातूर-१, पुणे-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत ५४१ नवे रुग्ण
मुंबईत आज ५४१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तर १५६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण २ लाख ७० हजार ६५४ जणांना करोनाची बाधा झाली. ज्यापैकी २ लाख ४७ हजार ३३९ जण हे करोनातून बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत १० हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ८ हजार ९४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.