बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन सात आठवडे झाले आहेत. या सात आठवड्यांत घरामध्ये अनेक अमुलाग्र बदल झाले आहेत. कधीकाळी घरात निर्माण झालेला केव्हीआरपीचा गृप तुटत आला आहे. तर नुकतंच सुरेखा पुणेकर यांना घरातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचं हे पर्व आता रंगतदार वळणावर येऊन ठेपलं आहे. त्यातच आता घरामध्ये कॅप्टनसी साठीचा टास्क रंगणार आहे.

काही दिवसापूर्वी घरामध्ये ‘अतिथी देवो भव:’ हा टास्क रंगला होता. यावेळी टीम A आणि टीम B मधील सदस्यांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे आता या दोन्ही टीममधील एका सदस्याला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे.  कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी घरातील सदस्यांना दोन व्यक्तींच्या नावाची निवड करायची होती. त्यामुळे त्यांनी रुपाली आणि अभिजीत केळकर या दोघांची नाव पुढे केली आहेत. त्यामुळे आता या दोघांमध्ये कॅप्टनसीसाठी टास्क रंगणार आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विकेंडच्या डावामध्ये सुरेखा पुणेकर यांना घराच्या बाहेर पडावं लागंल आहे. सुरेखा यांच्या जाण्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला दु:ख झालं होतं. मात्र हे सारं विसरून पुन्हा सगळ्यांनी त्यांचं लक्ष घरावर केंद्रित केलं आहे. तर रुपाली आणि अभिजीतही कॅप्टनसीच्या टास्कसाठी सज्ज झाले आहेत.