छोट्या पडद्यावर पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं मन जिंकणारी मालिका म्हणजे राजा रानीची गं जोडी. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. सध्या या मालिकेत संजीवनी आणि रणजीत यांच्या नात्यात अनेक चढउतार येत आहेत. मात्र, या नात्यात कितीही वितुष्ट आलं तरीदेखील दोघांच्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम, ओढ अजूनही कायम आहे. मात्र, आता रणजीतचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घरातल्यांनी घेतला आहे.

संजीवनीचं वय कमी असतानादेखील तिच्या वडिलांनी तिचं आणि रणजीतचं लग्न लावल्याचं ढाले-पाटील कुटुंबासमोर उघड झालं आहे. त्यामुळे ढाले-पाटील कुटुंबातील सगळ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. घरातील कोणतीच व्यक्ती संजीवनीशी बोलत नाही. त्यातच संजीवनीला तिचं बाळदेखील गमवावं लागलं. त्यामुळे रणजीत व संजीवनी यांच्या नात्यातील दुरावा आणखीनच वाढला आहे. यामध्येच आता रणजीतचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला असून रणजीतने या निर्णयाला होकार दिला आहे. त्यामुळे आता रणजीत पुन्हा संजीवनीसोबतच लग्न करणार की अन्य दुसऱ्या मुलीसोबत हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, येत्या रविवारी ६ तारखेला राजा रानीची गं जोडी या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. यामध्ये रणजीत नेमकं कोणाशी लग्न करतो हे उघड होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.