दीपिका रणवीरनंतर आता बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाहबंधनात अडकणार आहेत. जोधपूरमध्ये यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून अवघ्या काही तासांवर यांच्या विवाहसोहळा येऊन ठेपला आहे. प्रियांका आता विदेशी सून होणार असून नववधूच्या मनातील हुरहूर नेमकी काय असते आणि नव्या वातावरणात, नव्या माणसांमध्ये कसं रुळायचं हे प्रियांकाने सांगितलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या मुलींसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. ‘लग्न म्हटलं की मुलींच्या मनात भिती, हुरहूर, अनेक प्रश्न, उत्सुकता, दडपण अशा अनेक भावना निर्माण झाल्या असतात. मात्र या परिस्थिती घाबरुन किंवा गोंधळून न जाता नीट विचार केला तर हे प्रश्न आपोआप सुटतात’, असं प्रियांकाने म्हटलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘लग्नात नातेवाईक, मित्रपरिवार अशा साऱ्यांची रेलचेल असते. ही सारी मंडळी तुमच्यासाठी, तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येत असतात. हाच एक दिवस असतो जेव्हा साऱ्याचं लक्ष फक्त तुमच्याकडे असते. तुम्हाला काय हवं, काय नको याकडे जातीने लक्ष देत असतात. त्यामुळे हे सारे क्षण एन्जॉय करायचे असतात’.

दरम्यान, प्रियांका आणि निक पारंपारिक ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार असून संगीत सेरेमनीसाठी राजस्थानी थीम ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.