बॉलिवूडमधल्या बहुचर्चित पार्ट्यांपैकी एक म्हणजे बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी होणारी दिवाळी पार्टी. संपूर्ण घराला रोषणाई, झगमगाट आणि इंडस्ट्रीमधल्या बड्या तारकांची हजेरी.. ही या पार्टीची खासियत. सोशल मीडियापासून ते सामान्यांपर्यंत त्या पार्टीची चर्चा होते. मात्र यंदाच्या वर्षी हे चित्र दिसणार नाही. कारण या वर्षी बच्चन कुटुंबीयांनी दिवाळी पार्टी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यावर अभिषेक बच्चनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “होय हे खरं आहे. यावर्षी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं, त्यामुळे दिवाळीची पार्टी आयोजित केली जाणार नाही. माझ्या बहिणीच्या सासूचं निधन झालं आणि अशा परिस्थितीत कोण पार्टीचं आयोजन करतं? करोनाचं संकट अजूनही आहे आणि सर्वांना काळजीपूर्वक राहायची खूप गरज आहे. जितकं जमेल तितकं सोशल डिस्टन्सिंग पाळणं हेच सर्वोत्तम आहे.”

आणखी वाचा : पतीच्या आत्महत्येचं दु:ख सावरत मयुरी देशमुखचं पुनरागमन

जुलै महिन्यात बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या आणि अभिषेक बच्चन या चौघांना मुंबईतील नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.