बॉलीवूडमध्ये एकेकाळच्या नावाजलेल्या अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या गंभीर स्वभावासाठी ओळखल्या जातात. कडक स्वभाव असलेल्या जया मात्र काही गोष्टींमध्ये भावूक आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पण जया यांना दरवेळी रडवणारी कोणी व्यक्ती नसून ते एक गाणे आहे.

जया यांना एका चित्रटातील गाणे नेहमी रडवून जाते. बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातील ‘अबकी बरस भेजो भैया को…’ हे गाणे जया यांना नेहमी भावूक करून जाते. मुंबईत चालू असलेल्या मामि चित्रपट महोत्सवात बिमल रॉय यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या चर्चासत्रात जया यादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्याला बिमल रॉय यांच्या गाण्याने नेहमीच रडवल्याचे सांगितले. अजूनही जेव्हा कधी त्या हे गाणे ऐकतात तेव्हा त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या रडू लागतात. जया म्हणाल्या की, बिमल रॉय यांच्यासह मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे मी माझे दुर्भाग्य समजते. ते त्यांच्या चित्रपटात महिला पात्रांना अतिशय प्रभावीपणे दाखवायचे. आताचे चित्रपट हे निराशाजनक आहेत. आताच्या चित्रपटात संस्कृती आणि कला दूरदूरपर्यंत दिसत नाहीत. जास्तीत जास्त पैसे कमविण्याकरिता मोठमोठ्या कलाकारांना घेतले जाते. जया यांना जुने चित्रपट फार आवडतात. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, त्या काळच्या चित्रपटांमध्ये असलेले गांभीर्य आताच्या चित्रपटांमध्ये दिसत नाही. आता सगळा आकड्यांचा खेळ झाला आहे.

दरम्यान, हल्लीच्या चित्रपटांमधील कितीसे चेहरे देशाचं प्रतिनिधीत्त्व करतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हल्लीच्या चित्रपटांतील पात्रांवर पाश्चिमात्य वारे स्वार आहेत असे म्हटले. ‘असे का होत आहे हे मला माहित नाही. ते देश जास्त श्रीमंत आहे आणि प्रगत आहेत अशी अनेकांची धारणा आहे. पण, ‘माझ्या मते भारतीय त्यांच्यापेक्षा प्रगतिशील आहेत’. हल्लीचे चित्रपट पाहून मला दु:ख होतं, कुठल्यातरी शांत ठिकाणी निघून जाण्याचे विचार मनात येतात’, असेही जया बच्चन म्हणाल्या.