छोट्या पडद्यावरचा स्टार करणवीर बोहरा हा बिग बॉस १२ च्या विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारापैकी एक गणला जातो. आतापर्यंत घरात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्यास यशस्वी झालेल्या करणवीरला घरातील सदस्यांकडून चुकीची वागणूक दिली जाते. इतकंच नाही खुद्द सलमानसुद्धा अनेकदा करणवीरचा अपमान करतो. सलमानसहित कार्यक्रमाच्या आयोजकांचं करणवीरप्रती असलेलं वर्तन पाहून करणवीरची पत्नी नाराज झाली आहे. म्हणूनच करणवीरची पत्नी टीजे सिद्धू हिनं बिग बॉसच्या संपूर्ण टीमला खुलं पत्र ट्विटरवर लिहिलं आहे.

यापत्राद्वारे तिनं दुटप्पी भूमिका घेणाऱ्या बीग बॉसवर ताशेरे ओढले आहे. करणवीरचा वारंवार अपमान केला जातो, त्यानं काय परिधान करावं काय नाही यावरून खोचक टोमणे त्याला मारले जातात. पण तो नेहमीच सगळ्या गोष्टींना शांतपणे उत्तर देतो. त्याच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही स्पर्धकांवर बिग बॉस कारवाई करत नाही. अशा स्पर्धकांबाबतीत बिगबॉस नेहमीच दुटप्पी भूमिका घेतो.

यापुढे अशा प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही. करणवीर हा दोन मुलांचा पिता आहे हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवावं, असंही टिजेनं म्हटलं आहे. टीजेव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरच्या अन्य कलाकारांनदेखील सलमान आणि इतर स्पर्धकांचं करणवीरप्रती असलेल्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे.