‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व आता लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्य स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. ७९ दिवस हे सदस्य एकमेकांसोबत एकत्र राहिले. या ७९ दिवसांमध्ये यांचं एकमेकांसोबत चांगलं बॉण्डींग निर्माण झालं. मात्र एका घरात रहायचं म्हणजे भांड्याला भांड हे लागणारंच. त्यामुळे अनेक वेळा घरात सदस्यांचे परस्परांमध्ये मतभेद होताना दिसतात. त्यातच काही दिवसापूर्वी घरात आलेला नवा सदस्य आरोह वेलणकर याचेदेखील अनेक वेळा घरातील सदस्यांसोबत मतभेद होत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता त्याचं वीणा जगतापसोबत भांडण झालं असून त्यांचा वाद विकोपाला गेला आहे.

घरामध्ये प्रत्येक सदस्य कधी ना कधी तरी एकमेकांविषयी गॉसिप करताना पाहायला मिळतो. त्यातच वीणा आणि हिनादेखील आरोहविषयी गॉसिप करत असून ‘आरोहला सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो’, असं वीणा हिनाला सांगते. त्यासोबत आरोहच्या कोणकोणत्या गोष्टी तिला खटकतात यादेखील ती हिनाला सांगते. मात्र वीणा आणि हिनामधील हा संवाद आरोहला समजला आहे. त्यामुळे आता तो  वीणाला या गोष्टीचा जाब विचारणार आहे. विशेष म्हणजे आरोहने वीणाला जाब विचारल्यानंतर या दोघांमधील वाद विकोपाला जातो आणि हे भांडण प्रचंड वाढतं.

दरम्यान, बिग बॉस मराठीचं पर्व सुरु होऊन ७९ दिवस झाले आहेत. त्यामुळे आता घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही अंतिम टप्प्याची आस लागली आहे. आता या पर्वामध्ये अंतिम सामन्यात कोणते सदस्य राहणार आणि कोणता सदस्य बाजी मारुन बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.