टेलिव्हिजन विश्वात ‘डेली सोप क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर नेहमीच काही नव्या चेहऱ्यांना आपल्या मालिकांमधून संधी देत असते. २००१ ते २००५ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘कुसूम’ या माकितेतूनही असाच एक चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो चेहरा होता अभिनेत्री नौशीन अली सरदार हिचा. ‘कुसूम’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या नौशशीनने प्रेक्षकांच्या मनात असं काही घर केलं होतं, की ती अवघ्या काही काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण, या मालिकेनंतर मात्र ती या कलाविश्वात तशी फार कमीच दिसली.

जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ लोटला असून, तिला कधी एकतासोबतही पाहण्यात आलं नाही. याविषयी नौशीनने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. ‘मी एकताचा फार आदर करते. या कलाविश्वात तिनेच मला पहिली संधी दिली होती. आजही मला अनेकजण कुसूम म्हणूनच ओळखतात. पण, गेल्या काही काळात गोष्टी फार बदलल्या होत्या. मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. पण, त्या व्यक्तीने मला एकताविषयी काही काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर माझं चुकीचच मत तिच्यापर्यंत पोहोचवलं’, असं नौशीन म्हणाली.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

त्यानंतरच्या काळात एकताविषयी किंवा एकंदरच त्या प्रकरणाविषयी फार काही न बोलण्याचा नौशीनने निर्णय घेतला. जेणेकरुन आणखी गैरसमज होणार नाहीत. ‘मी तिच्याविषयी फार काही न बोलण्याचा निर्णय घेतला होता’, असं म्हणत एके दिवशी सर्व गैरसमज दूर होऊन गोष्टी पूर्वपदावर येतील अशी तिला आशा असल्याचंही नौशीनने स्पष्ट केलं. त्यासोबतच येत्या काळात एकतासोबत काम करण्यास आपण तयार असल्याचंही ती म्हणाली.

एक निर्माती म्हणून एकताच्या कामाची प्रशंसा करणाऱ्या नौशीनला आता ही ‘डेलीसोप क्वीन तिच्या मालिकांमध्ये किंवा इतर कोणत्या आगामी प्रोजेक्टमध्ये संधी देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.