मराठीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत अभिनयाचा एक वेगळचा ठसा उमटवला आहे. सध्या वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत नंदिनी शिर्के पाटील ही भूमिका साकारत आहे. मात्र सध्या त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांनी कोळी समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांना हात जोडून माफी मागावी लागली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? 'यामिली' या एका खासगी मासे विक्रेत्या अॅप बेस्ड कंपनीने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत 'बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री' असा आशय लिहिण्यात आला होता. ही जाहिरात काही क्षणात व्हायरल झाली. या जाहिरातीवरुन मच्छिमार संतप्त झाले होते. या जाहिरातीत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केले होते. 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' असे विधान वर्षा उसगांवकर यांनी केले. त्यांच्या या विधानाचा कोळी समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला. आणखी वाचा : “…तर मी त्यांची हात जोडून माफी मागते” कोळी समाजाबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वर्षा उसगांवकरांनी मागितली माफी या जाहिरातीनंतर कोळी महिला विक्रेत्या चांगल्याच संतापल्या होत्या. "वर्षा उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांच्या प्रती असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत आहे", असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती महिला अध्यक्षा नयना पाटील म्हटलं होतं. त्यासोबतच त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा शब्दांत त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. यानंतर सोमवारी दुपारनंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली. वर्षा यांनी या ॲपचे प्रमोशन केले होते. वर्षा उसगावकरांचा माफीनामा या संपूर्ण प्रकरणानंतर वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची हात जोडून माफी मागितली आहे. याद्वारे त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. "नमस्कार मी वर्षा उसगांवकर, यामिली या अॅपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्याउलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. धन्यवाद", असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.