आज अलका कुबल हे नाव जरी घेतलं तरी सर्वांत पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे ‘लक्ष्मी’. माहेरच्या साडी या चित्रपटातील ‘लक्ष्मी’ अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. अलका कुबल यांचे कोणतेही चित्रपट आज टीव्हीवर लागले, तर आजच्या पिढीतील मुलं पालकांना लगेच म्हणतात, काय हे रडके चित्रपट बघताय? पण हे चित्रपट बघण्यासाठी पालकांनी केलेली धडपड किंवा त्या काळातील अलका कुबल यांच्यासाठी असलेलं वेड ऐकल्यानंतर असं वाटतं, एकदा तरी या त्यांचे चित्रपट आवर्जून पाहावेत. ९० च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील नायिकाप्रधान चित्रपटांचं पर्व त्यांनी गाजवलं. प्रत्येक जण अलका कुबल यांच्यात आपली मुलगी, सून, ताई, आई हे नातं पाहत आले आहेत. त्यांची जागा आजवर कोणतीच अभिनेत्री घेऊ शकली नाही, असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. अशा बहुगुणी, संवेदनशील अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आजवरचा त्यांचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलका कुबल या मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या आहेत. त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका; तर बाबा टाटा मिलमध्ये इलेक्ट्रिक विभागात सुपरवायझर होते. अलका या शेंडेफळ म्हणजे त्यांना दोन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. वयाच्या आठव्या वर्षी अलका कुबल यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यामागे होते त्यांचे आजोबा बाबुराव मुंबरकर; जे जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर इंग्रजी हटाव या मोहिमेत होते. एके दिवशी ते अलका यांना ‘वासूनाका’ कादंबरीचे लेखक भाऊ पाध्ये यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी अलका यांना डान्स करता येतो का?, असं त्यांनी विचारलं. तेव्हा अलका यांनी लगेचच डान्स करून दाखवला आणि गाणं गाऊन दाखवलं. मग भाऊ पाध्ये यांनी अलका यांना नाटकात काम करशील का? असं विचारलं. त्या क्षणी अलका यांनी होकार दिला. मग ‘नटसम्राट’ नाटकातील तिसरी ठमी अलका यांना साकारायला मिळाली. अभिनेते दत्ता भट्ट आणि अभिनेत्री शांता जोग यांच्याबरोबर वयाच्या आठ ते दहा वर्षादरम्यान अलका यांनी ‘नटसम्राट’ नाटकाचे तब्बल २५० प्रयोग केले. मग त्यांनी ‘संध्याछाया’ नाटकाचे ८० ते ९० प्रयोग केले. तसेच ‘वेडा वृंदावन’ नाटकाचेही जवळपास ८० ते ९० प्रयोग केले. अलका कुबल यांची बालकलाकार म्हणून रंगभूमीवर अशी दमदार एन्ट्री झाली. लहान वयातच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाल्यानं त्यांनी ठरवलं की, आता आपल्याला अभिनेत्रीच व्हायचं आहे.

हेही वाचा – भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’

अलका यांचं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत झालं. त्यानंतरचं उर्वरित शिक्षण गोरेगावातील महाराष्ट्र विद्यालयामध्ये झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बीए विथ सायकॉलॉजी घेतलं. बारावीपर्यंत त्या दालमिया कॉलेजमध्ये होत्या. तेरावीला त्यांनी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला होता. पण १२ वी पास होताच अलका यांना पहिला चित्रपट ‘लेक चालली सासरला’ हा मिळाला अन् शिक्षणाचं सर्व गणित बिघडलं. ‘लेक चालली सासरला’ चित्रपटानंतर त्यांच्यातील अभिनयाची ओढ आणखी वाढली. पण, असं असलं तरी त्यांनी घरीच अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. अकरावीमध्ये असताना अलका यांच्या वडिलांचं छत्र हरपलं. तेव्हापासून त्यांच्या आईनं चारही मुलांचं संगोपन केलं.

नायिका म्हणून काम केलेलं अलका यांचं ‘वटवट सावित्री’ हे पहिलं नाटक. त्यानंतर त्यांनी ‘आपलं माणूस’ हे नाटक केलं. त्यांनी या दोन नाटकांचे शंभरपर्यंत प्रयोग केले. त्यांचा ‘लेक चालली सासरला’ हा पहिलाच चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाला. त्यानंतर अलका यांच्याकडे बरेच चित्रपट आले. त्यामुळे त्यांनी नाटकाकडे पाठ फिरवली. माहेरची साडी या चित्रपटाच्या आधी अलका यांनी ३० चित्रपट केले. पण अलका कुबल यांच्यासाठी ‘माहेरची साडी’ चित्रपट खरा माइलस्टोन ठरला. कारण- या चित्रपटानंतर २०० चित्रपट अलका यांच्या वाट्याला आले. ‘माहेरची साडी’ चित्रपटानंतर अलका १२ ते १५ वर्षं या मधल्या काळात ‘त्या’ जागेवर अढळ होत्या. पण अशा लोकप्रिय अभिनेत्रीला मात्र एका अपघातानंतर मराठी सिनेसृष्टीतील दुसरी रंजना म्हटलं जाऊ लागलं. त्या अपघातानंतर अलका कायमच्या रंजना यांच्याप्रमाणे व्हीलचेअरवर बसून राहणार, अशी अफवा पसरली होती.

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

दहा किंवा ११ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. शूट झाल्यानंतर अलका कोल्हापूरहून नवी गाडी घेऊन संध्याकाळी ६ वाजता मुंबईला परतत होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची बहीणदेखील होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाइट्समुळे वळणं कळतं नव्हती. साताऱ्याजवळ एका ब्रिजचं काम सुरू होतं. पण तशा प्रकारचा कुठलाही माहिती फलक तिथे लावण्यात आला नव्हता. त्यामुळे तिथे काही अपघात झाले होते आणि अलका यांच्या गाडीचादेखील त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये त्यांच्या गाडीचा चेंदामेंदा झाला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे अलका यांना बरंच काही भोगावं लागलं.

या भीषण अपघाताच्या एक वर्षानंतर अलका यांच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली. सहा महिने त्या बेडवर झोपून होत्या. यावेळी अलका यांच्या हातात सहा चित्रपट होते. पण अपघातानंतर सिनेसृष्टीत अफवा पसरली की, अलका पुन्हा काम करू शकणार नाहीत. रंजनाप्रमाणे त्यासुद्धा कायमच्या व्हीलचेअरवर बसून राहणार. तेव्हा सहा चित्रपटांचे निर्माते अलका यांच्याकडून मानधनाचे चेक परत घेऊन गेले. त्यामुळे त्यांना खूप वेदना झाल्या. या काळात त्यांचं वजन ११० किलो झालं होतं. लोकांमध्ये फिरताना त्यांना लाज वाटू लागली होती. जेव्हा त्या बाहेर फिरायला जायच्या. तेव्हा लोक अलका यांना टोमणे मारत. काय तुम्ही, अभिनेत्री आहात आणि तुमचं किती वजन वाढलंय, तुम्हाला काही वाटत नाही का? असं लोक म्हणू लागले. पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्या पुन्हा जिद्दीनं उभ्या राहिल्या. आजही त्या तितक्याचं जोमानं काम करताना पाहायला मिळत आहेत. अशा हा सुपरहिट अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress alka kubal birthday special when she face major accident pps