रवींद्र पाथरे

सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव ही तत्त्वं ज्या देशाचा पाया आहे असा आपला देश सध्या ‘हिंदुत्ववादी’ म्हणून नवी प्रतिमा अंगीकारतो आहे. सहिष्णुता हा ज्या देशाचा पिंड होता आणि आहेही, त्या भारतात आज सर्रास अन्यधर्मीयांचे दमन सुरू आहे. धाकदपटशा ही आपली संस्कृती बनत चालली आहे. आणि एकेकाळी वैचारिक मतभेद चर्चा करून सोडवले जात होते तिथे आता हिंसेची भाषा बोलली जात आहे. ‘पुरोगामी’ ही आता शिवी मानली जाऊ लागली आहे. आणि देशाला वैचारिक दिशा देणारे विचारवंत या परिस्थितीने पार कोशात गेले आहेत. त्यांची ही स्थिती, तर मग सामान्य माणसांचं काय? ते तसेही जगण्याच्या संघर्षांत गलितगात्र झालेले असतातच.

Artificial General Intelligence (AGI)
AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?

दुसरीकडे घटनात्मक संस्थांची स्वायतत्ता मोडीत काढण्यात येत आहे. विरोधी विचारांच्या मंडळींना कुठल्या ना कुठल्या ‘गुन्ह्य़ा’त अडकवलं जात आहे आणि त्याद्वारे त्यांचा आवाज बंद करण्यात येत आहे, किंवा मग त्यांना ‘विकत’ तरी घेतलं जात आहे. यातलं अगदीच काही नाही जमलं तर ईडी, सीबीआय वगैरे आहेतच. राजकारणाने किती खालची पातळी गाठावी याला आज धरबंदच उरलेला नाहीए. अशा भीषण, भयावह वातावरणात आपण सारेच जगतो आहोत.. जीव मुठीत धरून! सगळीकडे ठार कानठळ्या बसवणारी शांतता आहे. अशा कातरवेळी हेमंत एदलाबादकर लिखित व दिग्दर्शित ‘चर्चा तर होणारच!’ हे नाटक पाहिलं आणि सभोवतालच्या काळ्याकुट्ट काळोखात आशेचा एक किरण जागवला गेला. मराठी रंगभूमीने नेहमीच समकालीन विषय मोठय़ा ताकदीने आणि धैर्याने मांडलेले आहेत. याची पुन्हा एकदा प्रचीती आली. ‘अंधेरे में एक प्रकाश..’ दृष्टीस पडला. आजच्या वास्तवावर व्यक्त होणं आपण सोडूनच दिलंय की काय असं वाटावं अशी परिस्थिती असताना या नाटकाने ‘सारं काही संपलंय’ या नैराश्याच्या खाईतून काहीसं बाहेर काढलं. त्याबद्दल हेमंत एदलाबादकर आणि नाटकाच्या निर्मात्यांच्या साहसाला प्रथम प्रणाम.

परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे. एक परंपरावादी, धर्माभिमानी, राष्ट्रवादी विचारांचा कार्यकर्ता, तर दुसरी जग बदलायला निघालेली क्रांतिकारी तरुणी. सत्यशील आणि मृणाल. त्यांची आमनेसामने गाठ पडते ती एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत! कुणीएक पंचतारांकित एनजीओ या दोघांपैकी एकाला पुरस्कार देण्याच्या निमित्ताने त्यांच्या तत्त्वप्रणालीची कसोटी बघणारा हा सामना घडवून आणते. या एनजीओचा देशपांडे नामक एजंट एका बंगल्यात त्या दोघांना समोरासमोर आणतो आणि त्यांच्यात आवडती पुस्तकं, परंपरावाद, स्त्रीवाद या विषयांवर त्यांची वादचर्चा घडवून आणतो. दोघंही आपापली बाजू जोरदारपणे मांडतात. विचारांचं, तत्त्वांचं खंडणमंडन होतं. रेफरी देशपांडे या लढतीचा ‘ऑंखे देखा हाल’ सतत त्याच्या वरिष्ठांना कळवीत असतो. दिवसभर चाललेल्या या चर्चेच्या अखेरीस पुरस्कारविजेता निश्चित केला जाणार असतो. सामाजिक दायित्वाचं बाळकडू घरीच आई-वडलांकडून मिळालेली मृणाल आपले विचार पोटतिडिकेनं मांडते. सत्यशीलही आपले विचार आपल्या परीनं ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण मुळातच मागासलेल्या तत्त्वांची कितीही हिरीरीने मांडणी केली तरी आजच्या आधुनिक युगात ती निष्फळच ठरणार. यात रेफरी देशपांडे सत्यशीलची पडती बाजू मजबूत करण्यासाठी त्याला एक युक्ती सुचवतो. ती सत्यशीलला तत्त्वत: मान्य नसली तरी परिस्थितीच्या तकाज्याने कंबरडे मोडलेला तो ती नाइलाजानं मान्य करतो. पण.. तरीही मृणालच बाजी मारते. सत्यशील आपली हार मान्य करतो. स्पर्धेतून बिनशर्त माघार घेतो.

पण.. हा ‘पण’च या नाटकात महत्त्वाचा आहे. आणि तो इथं उघड करणं अनुचित ठरेल. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे शिवधनुष्यच उचलले आहे. सद्य:परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी त्यांनी योजलेला यातला चर्चानाटय़ाचा बाज सर्वस्वी चपखल आहे. त्यामुळे नित्याच्या व्यावसायिक धारेतील नाटकाच्या प्रेक्षकांना जरी धक्का बसत असला तरी त्यांचे प्रबोधन यातून निश्चितच होते. चर्चानाटय़ंही प्रभावीपणे एखादा विषय ऐरणीवर आणू शकतात हेच यातून सिद्ध होते. अर्थात चर्चानाटय़ं मुख्य धारेतील प्रेक्षकांना आकळत नाहीत असं म्हणणं म्हणजे त्यांच्या बुद्धय़ांकाचा अपमान करणं होय. तसं मानणारे लोकच बौद्धिकदृष्टय़ा मागास असतात. असो.

तर.. आजचं आजूबाजूचं भयाण वास्तव या नाटकाने झणझणीतपणे मांडलं आहे. त्यावर व्यक्त होणं हे एक धाडसच आहे खरं; पण नाटककर्त्यां मंडळींनी ते केलं आहे. त्याचं आपण स्वागत करायला हवं. एकीकडे आपण आधुनिक युगाचे सगळे लाभ घेऊ इच्छितो आणि दुसरीकडे मागासलेल्या, सनातनी विचारांची कावड खांद्यांवर घेऊन जगतो.. यातला विरोधाभास कुणालाच कसा खटकत नाही? आज जगभरातच उजव्या विचारांचं नेतृत्व सत्तास्थानी विराजमान होताना दिसतं. याचा अर्थही कसा लावायचा, हे एक गूढच आहे. परंतु या प्रवृत्तींचा सर्वशक्तिनिशी विरोध करायला हवा यात शंकाच नाही. ते काम हे नाटक करतं. उत्तरार्धात या नाटकाला मिळालेली कलाटणीसुद्धा आजच्या वास्तवावर शिक्कामोर्तब करणारी आहे.. जरी ती या नाटकातल्या समस्येचं सुलभीकरण आहे असं वाटली, तरीदेखील! या सर्वंकष वैचारिक चर्चेसाठी लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी नाटकाच्या आशय-विषयाशी प्रामाणिक राहून ‘प्रयोग’ बांधला आहे.

अदिती सारंगधर बऱ्याच वर्षांच्या खंडानंतर रंगभूमीवर पुनरागमन करत्या झाल्या आहेत. आणि त्याही अशा सशक्त नाटकाद्वारे! मृणालची तडफड, तिची समर्पित सामाजिक बांधिलकी, त्याकरताची आतडय़ातून आलेली तगमग त्यांनी अत्यंत उत्कटतेनं व्यक्त केलेली आहे. सांगलीकडचा गावरान तडका त्यांच्या बोलीत आणि शारीर बोलीतही प्रकर्षांनं जाणवतो. आस्ताद काळे यांनी सत्यशीलच्या रूपात उजव्या, परंपरावादी विचारांच्या समाजकार्यकर्त्यांचा वानवळा तितक्याच सहजतेनं उभा केला आहे. या विचारांची मंडळी व्हिलन नाहीएत. पण आपल्या तत्त्वप्रणालीचं खुल्या मनाने आत्मपरीक्षण करण्यास नकार देण्याची त्यांची वृत्ती त्यांना मागास बनवते. विदेशी एनजीओचा अत्यंत उद्धट, माजोर्डा प्रतिनिधी म्हणून देशपांडे झालेले क्षितीज झारापकर भूमिकेला जागले आहेत. शेवटची त्यांची उपरती आणि केविलवाणेपण अशांची जी गत होते ते वस्तुनिष्ठपणे दर्शवते. नाटकाची तांत्रिक अंगं यथार्थ आहेत. एकुणात मराठी रंगभूमी प्रागतिक का मानली जाते आणि ती काळाचं आकलन करण्यात कशी चुकत नाही, हे पाहायचं असेल तर प्रत्येक नाटय़रसिकानं हे नाटक आवर्जून पाहायला हवं.