काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ सीरिज सुरु केली आहे. या सीरिजमध्ये ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेतात. या मुलाखती समाजातील विविध समस्यांवर आधारित असतात. या मुलाखतींवर काही जण टीका देखील करतात. विरोधकांच्या या टीकेवर आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही राहुल गांधींवर इतकी टीका का करता?” असा प्रश्न तिने टीकाकारांना विचारला आहे.

“काही लोक राहुल गांधींवर ट्विटरच्या माध्यमातून इतकी टीका का करतात? ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. तज्ज्ञांसोबत केलेल्या या चर्चेतून सध्याच्या परिस्थितीचं आकलन करण्यास मदत होते. शिवाय भविष्यकालीन समस्या आणि त्यावरील उपाय देखील कळतात. मला वाटतं की टीका केवळ राजकारण करण्यासाठी केली जाते.” अशा आशयाचे ट्विट स्वरा भास्कर हिने केले आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर प्रतिक्रिया देत असते. अनेकदा ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करते. या पार्श्वभूमीवर तिचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.