रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्ल्या यांच्याबरोबरचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर दीपिकाने आपल्या कारकिर्दीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. ‘कॉकटेल’, ‘रेस २’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असे एका पाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देत दीपिकाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान कायम केले आहे. नेमक्या याचवेळी संजय लीला भन्साळीने ‘रामलीला’मधून दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर आणायचे ठरविले. आणि भन्साळींच्या दिग्दर्शिक ‘मॅजिक’मुळे असेल पण पडद्यावर आणि पडद्याबाहेरही दीपिका-रणवीर यांची ‘केमिस्ट्री’ रंगली आहे. चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येऊनही दीपिकाला रणवीर एवढा आवडला आहे की त्याचे कौतुक करताना ती थांबतच नाही.
‘रामलीला’मध्ये खरे म्हणजे रणवीरपेक्षा अभिनेत्री म्हणून दीपिकाचे पारडे जड आहे. दीपिकाने अल्पावधीतच चांगले चित्रपट देत नंबर वन स्पर्धेत आपली जागा पक्की केली आहे. मात्र रणवीरला चार चित्रपट होऊनही यशाचे हे गणित जमवता आलेले नाही. रणवीर सिंग सध्या इंडस्ट्रीतला आवडता कलाकार असला तरी एक ‘लुटेरा’ वगळता त्याला सोलो हीट चित्रपट देता आलेला नाही. ‘रामलीला’ हा रणवीर सिंगच्या दृष्टीने फार महत्त्वाचा चित्रपट आहे. मात्र असे असतानाही रणवीर हा सगळ्यात चांगला अभिनेता असल्याची कौतुकाची पावती दीपिकाने दिली आहे.
इंडस्ट्रीत मी बऱ्याच कलाकारांबरोबर काम केले आहे. मात्र बऱ्याचदा ते आपल्या भूमिकेच्या बाबतीत स्वार्थी असतात. आपली भूमिका सोडून इतर कोणत्याही गोष्टींना त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्व नसते. मात्र रणवीरबरोबर काम करताना तुम्हाला वेगळाच अनुभव येतो. तो सहज अभिनय करणाऱ्यांमधला आहे. तसाच आपल्या भूमिकेविषयी काहीही हातचे राखून ठेवणे त्याला जमत नाही. तो स्वत:ही काम करताना सहकलाकाराकडूनही एखादा सीन वेगळा कसा होईल याची काळजी घेतो. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना सगळ्यात जास्त मजा अनुभवता येते, अशा शब्दांत दीपिकाने रणवीर सिंगचे कौतुकगान केले आहे.
दीपिकाच जोडीनेच खुद्द संजय लीला भन्साळीही आपल्या हीरोच्या प्रेमात आहे. ही जोडी भन्नाट केमिस्ट्री लोकांसमोर मांडेल, असा विश्वास भन्साळीलाही वाटतोय. या सगळ्यामुळे दीपिकाचे रणवीरप्रेम वाढत चालले आहे. या जोडीने खुल्लमखुल्ला कबूल केले नसले तरीही दीपिका आणि रणवीर सिंग यांच्यात ‘काहीतरी’ घडतेय असे इंडस्ट्रीतील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वाटू लागले आहे.