सीआयडी ही छोड्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. क्राईम आणि सस्पेन्सनं भरलेल्या या मालिकेने जवळपास २० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे ही मालिका बंद झाल्यामुळे काही प्रेक्षक नाराज आहेत. सीआयडी बंद का करण्यात आलं? हा सवाल वारंवार मालिकेत काम केलेल्या कलाकारांना विचारला जातो. चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अभिनेता दयानंद शेट्टी यानं दिलं आहे.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

सीआडीमध्ये दयानंद सीनिअर इन्स्पेक्टर दया ही व्यक्तिरेखा साकारत होता. अलिकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सीआडी बंद होण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “कुठल्याही गुन्हेगारी विषयावर आधारित असलेल्या मालिका तयार करताना काही मर्यादा येतात. सर्वात मोठी मर्यादा म्हणजे कथेमधील नाविन्य. पटकथा लेखकाला सतत नवीन काहीतरी शोधावं लागतं. अन्यथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं खूप कठीण जातं. आत्ताच्या प्रेक्षकांसमोर क्राईम विश्वावर आधारित शेकडो चित्रपट आणि मालिका आहेत. त्यामुळे कथानकात पुढे काय घडू शकतं याचा अंदाज ते सहज गतीने लावतात. सीआयडीच्या बाबतीतही असंच काहीसं घडू लागलं होतं. कथानकात हळूहळू तोच-तोचपणा येऊ लागला होता. त्यामुळे प्रेक्षक नाराज होण्याआधीच मालिका थांबवणं निर्मात्यांना योग्य वाटलं. भविष्यात चांगल्या पटकथा तयार करण्यात आल्या तर कदाचित सीआयडी पुन्हा एकदा सुरू केलं जाऊ शकतं.” असा संकेतही दयानं या मुलाखतीत दिला.