लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने विवाहित तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना बोरिवलीत घडली आहे. आरोपी तरुणाने तीन वर्षांपुर्वी पीडित तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तरुणीने नकार दिला होता. तीन वर्षांनी पुन्हा एकदा आरोपी तरुणाने लग्नासाठी विचारणा केली. यावेळी पुन्हा नकार मिळाल्याने तरुणाने चाकूने हल्ला करत तरुणी आणि तिच्या बहिणीला जखमी केलं. बोरिवीलमधील शिंपोली परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल कनोजिया तीन वर्षांपुर्वी नम्रता हिच्या प्रेमात पडला होता. यानंतर त्याने तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण नम्रता आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नासाठी नकार दिला होता. मे महिन्यात नम्रताचे लग्न झाले. यानंतर ती आपल्या पतीसोबत शिफ्ट झाली होती.

सोमवारी नम्रता एका लग्नासाठी घरी आली होती. जेवणानंतर घराबाहेर पडली असता आरोपी अतुल कोनाजिया याने तिला गाठलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्याने पुन्हा एकदा नम्रतासमोर लग्नासाठी प्रस्ताव ठेवला. तिने नकार दिला असता अतुलने तिच्यावर चाकूने हल्ला केला. नम्रताची मोठी बहीण अंकिता बचावासाठी पुढे आले असता, आरोपीने तिच्यावरही हल्ला करत जखमी केलं.

यावेळी नम्रताचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. पण मुलींचा रक्तसत्राव रोखण्यात लक्ष असल्याने आरोपीने संधी साधत पळ काढला. पोलीस स्टेशन गाठलं असता पोलिसांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. अंकिता जास्त जखमी नसल्याने तिला लगेच डिस्चार्ज देण्यात आला. पण नम्रताला गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.