मुंबईत सर्वाधिक दुर्घटना चारचाकी छोटय़ा गाडय़ांच्या; दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवरील अपघातांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. पण अपघात वाढले असले, तरी अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील रस्त्यांवर २०१५ या वर्षांत २३४६८ अपघात झाले होते. त्यापैकी ५८६ अपघात जीवघेणे ठरले होते आणि त्यात ६११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये अपघातांचा आकडा २४६३९ वर पोहोचला. त्यापैकी ४३८ अपघात जीवघेणे ठरले. या ४३८ अपघातांमध्ये ४६७ जणांनी जीव गमावला. विशेष म्हणजे दोन वर्षांची तुलना केल्यास दुचाकी गाडय़ांपेक्षा चारचाकी गाडय़ांच्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील वाहतूक पोलिसांकडून रस्ते सुरक्षा सप्ताह राबवला जातो. त्यामुळे मुंबईतील वाहतूक शिस्तबद्ध असते. पण वाहनांची वाढती संख्या, पूर्व मुक्तमार्गासारखे वेगाला चालना देणारे मार्ग आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण यामुळे शहरातील अपघातांच्या संख्येत २०१५च्या तुलनेत २०१६ या वर्षांत वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल १२०० एवढी आहे. अपघाती मृत्यूंप्रमाणे अपघातांमध्ये गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये घसरल्याचे दिसते. २०१५ मध्ये ४०२९ मुंबईकर विविध अपघातांमध्ये गंभीररीत्या किंवा किरकोळ जखमी झाले होते. २०१६ मध्ये ही संख्या ३२१६ एवढी खाली आली आहे. या अपघातांमध्ये चारचाकी गाडय़ांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१५ मध्ये हे प्रमाण ९७३२ एवढे होते, तर या ९७३२ अपघातांपैकी ११९ जीवघेण्या अपघातांमध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला. या वर्षी दुचाकीवरून झालेल्या अपघातांचे प्रमाण ३१३८ एवढे असून त्यात १६२ अपघातांमध्ये १६९ लोक ठार झाले होते. २०१६ मध्ये चारचाकी गाडय़ांच्या अपघातांची संख्या ९६५५ एवढी होती. यात ९८ जीवघेण्या अपघातांमध्ये १०९ जण ठार झाले, तर दुचाकींच्या २७८४ अपघातांपैकी १०१ अपघातांमध्ये १०४ जणांचा मृत्यू झाला. छोटय़ा खासगी गाडय़ांचे चालक बेदरकारपणे गाडय़ा चालवत असल्याने अपघात होत असल्याचे वाहतूक पोलीस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.