भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर टीका केली व घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. Speaking to media after visiting Bhandup hospital. #BhandupFire — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 26, 2021 भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; कारवाईचा इशारा देत म्हणाले. फडणवीस म्हणाले, “जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.” मुंबई – भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू तसेच, “जर फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भात जर कार्यवाही झालेली नाही, तर त्यासंदर्भात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजणांची प्रकृती गंभीर आहे.” असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.