विधिमंडळाचे सहा आठवडे चाललेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संस्थगित करण्यात आले. गोंधळामुळे अधिवेशनाचा बराचसा कालावधी वाया गेला.  पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली. सहा आठवडय़ांचे अधिवेशन असले तरी प्रत्यक्ष कामकाज २४ दिवस झाले. या कालावधीत १३४ तास प्रत्यक्ष कामकाज झाले असून, ६२ तास ३० मिनिटांचे कामकाज वाया गेले. दररोज सरासरी पाच तास, ३५ मिनिटे कामकाज झाले.
अजित पवार यांचे वक्तव्य, राज्यपालांचे निर्देश, आमदार-पोलीस संघर्ष, विरोधी आमदारांच्या मतदारसंघांसाठी निधी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा घोळ आदी विषयांवरून झालेल्या गोंधळात सभागृहाचे बरेचसे कामकाज वाया गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठ दिवसांचे कामकाज गोंधळात वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अधिवेशनात उभय सभागृहांमध्ये १० विधेयके मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.