विरार ते डहाणूमधील लोकल फेऱ्यांमध्ये प्रयोग; ‘एमआरव्हीसी’च्या सर्वेक्षणानंतर निर्णय मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना असामाजिक घटकांकडून छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आल्याने विरार-डहाणूमधील चार लोकल फेऱ्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत दरम्यान एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली होती. त्यानंतर आणखी काही फेऱ्यांमध्ये मनुष्यबळ वाढवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. विरार ते डहाणू आणि नेरळ ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. दररोज कामानिमित्त हजारो महिला या भागात प्रवास करत असतात. तर काही महिला मुंबईच्या दिशेनेही येतात. या प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना विनयभंग, छळवणुकीला सामोरे जावे लागते. ही बाब सर्वेक्षणात उघड झाली. पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू दरम्यानच्या ४५ टक्के महिलांनी, तर मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत दरम्यानच्या १० पैकी चार महिलांनी प्रवासात असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. सर्वेक्षण समोर येताच याची दखल घेत पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने विरार ते डहाणू दरम्यान धावणाऱ्या चार लोकल फेऱ्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानुसार विरारमधून सुटणाऱ्या आणि डहाणूमधून सुटणाऱ्या प्रत्येकी दोन लोकल फेऱ्यांमध्ये मनुष्यबळ आहे. बारा डब्यांच्या मधल्या प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी महिला डब्यांजवळच्याच दोन डब्यात सुरक्षा दलाचा प्रत्येकी एक जवान तैनात करताना त्यांना दरवाजाजवळच उभे राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांना पकडता येणे शक्य होईल. रात्री सात ते रात्री दहापर्यंत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात असल्याचे सांगितले. विरारपुढील काही लोकल फेऱ्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ नाही. याशिवाय महिला लोकल फेऱ्यांमध्येच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असताना आता सामान्य लोकलच्या डब्यातही महिला प्रवाशांसाठी सुरक्षा दल तैनात केले जात आहे. ४५ टक्के महिलांना त्रास एमआरव्हीसीच्या २०१९ मधील महिला प्रवाशांच्या सर्वेक्षणात लोकल गाडय़ांना होणाऱ्या गर्दीबरोबरच काही असामाजिक घटकांकडून महिलांना दिला जाणारा त्रास पाहता त्यावेळीही लोकल प्रवास करण्याचे टाळत आहेत. जवळपास ४५ टक्के महिला विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवासात छळ व त्रास होत असल्याचे सांगतात.