विरोधकांच्या महासभेतील एकमुखी आवाजाने मोदी सरकारची तोफही थरथरली, अशी बोचरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? असा सवालही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केला आहे.

२२ विरोधी पक्षांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. मात्र, त्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका करण्याचे कारण काय? असा सवाल करताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेनेसह कोणी बोलले तर ते लोकविरोधी, देशविरोधी होते. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. जनता मुर्ख नाही त्यांना सर्वकाही समजते त्यामुळे मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. याचे शिवसेनेकडून कौतुक करण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम बंगालची ही वाघीण मोदी-शहांना सळो की पळो करुन सोडत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. शिवसनेलाही कोलकात्याच्या महासभेत यावे आणि मोदी सरकारविरोधात रणशिंग फुकावे अशी ममतांची इच्छा होती. मात्र, आमचे रणशिंग आम्ही आमच्याच मैदानात फुकत असतो आणि ते याआधीच फुंकले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मात्र, महाआघाडीत पासवान, नितीशकुमार आणि आठवलेंसारखे नमुने आहेत ज्यांचा राम मंदिराला विरोध आहे त्यामुळे महाआघाडीला आमचा विचार झेपला नसता असेही शिवसेनेने म्हटले आहे.

महाआघाडीवर टीका करण्यापेक्षा विरोधकांचा भडीमार मोदींनी संयमाने सहन करायला हवा असा सल्लाही शिवसेनेकडून सरकारला देण्यात आला आहे. सरकार देशाचे शत्रू नाही मात्र आपले सरकार अमर असल्याच्या भ्रमात त्यांनी राहू नये, असा खोचक टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकविरोधाची पर्वा न करता भाजपाने मेहबुबा मुफ्तींसोबत सत्ता उपभोगली. त्यानंतर स्वतःच त्यातून बाहेर पडून मुफ्ती देशविरोधी असल्याचा डांगोरा भाजपा पिटत असल्याचे शिवसनेने म्हटले आहे.