हार्बर मार्गावर नऊ डब्यांच्या गाडय़ांऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप अनुकूलता मिळालेली नाही. परिणामी १२ नव्हे तर १० डब्यांची गाडी या मार्गावरून सुरू करण्याबाबतचा प्रकल्प किमान तीन महिने रेंगाळला आहे.
हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत मुंबई रेल विकास मंडळाने ७१४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून राज्य सरकारकडे परवनागीसाठी तो सात महिन्यांपूर्वी सादर केला होता. मात्र राज्य सरकारकडून या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.  राज्य सरकारच्या या निष्क्रियतेमुळे हा प्रकल्प तीन ते चार महिने रेंगाळला असल्याचेही प्राधिकरणाचे मत आहे. १९ स्थानकांच्या फलाटांचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मंजुरी मिळण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी १२ ऐवजी १० डब्यांची गाडी चालविण्याबाबत चाचपणी केली. मात्र त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या तरी हार्बर मार्गावर नऊ डब्यांच्याच गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.