देशाची अर्थव्यवस्था पेलणारा मान्सून शेतीपासून उद्योगापर्यंत सर्वावरच प्रभाव टाकतो. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाऊस जसा महत्त्वाचा ठरतो त्याचप्रमाणे या महानगरीत वास्तव्य करणाऱ्यांच्या आरोग्यासाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. लाखो वाहने, बांधकाम सुरू असलेली हजारो ठिकाणे यामुळे मुंबईच्या हवेत दररोज पसरणारे घातक कण पावसासोबत धुऊन निघत होते. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने रजा घेतल्याबरोबर आणि समुद्रावरील वाऱ्याचा वेग कमी झाल्याने मुंबईतील प्रदूषणाचा आलेख वर जाण्यास सुरुवात झाली आहे.

भारतातील शहरांमध्ये प्रदूषणाचा आलेख मोजण्याची सुरुवात अनेक वर्षांपासून आहे. मात्र या वर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. जगभरातील अनेक देशांत यापूर्वीच ही पद्धत सुरू झाली आहे. शहरातील लोकांना हवेतील प्रदूषणाची थेट माहिती मिळावी व त्यातून जनजागृती होऊन प्रदूषण कमी व्हावे हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे. या प्रकल्पान्वये मुंबईतही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेची प्रतवारी करण्यास एप्रिलमध्ये सुरुवात झाली. सुरुवातीचा दीड महिना मुंबईची हवा मध्यम स्वरूपाचे प्रदूषण दाखवत होती. या हवेत फुप्फुस तसेच हृदयाचा विकार असलेल्यांना तसेच लहान मुलांना व वृद्धांना श्वास घेण्यात अडचणी येतात. मात्र मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारे समुद्रावरील वारे सुरू झाले आणि मुंबईची हवा बदलू लागली. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईतील प्रदूषणाची पातळी खाली आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याअखेपर्यंत २८ ऑगस्ट, २९ सप्टेंबर व ३० सप्टेंबर या तीन दिवसांचा अपवाद वगळता मुंबईची हवा समाधानकारक राहिली होती. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून ऋतुबदल होण्यास सुरुवात झाली आणि मुंबईकरांचे नशीब पावसासोबत पालटले. ६ ऑक्टोबरपासून मुंबईच्या हवेची पातळी घसरली आहे. सध्या मुंबईची हवा १५० ते २०० या अंकांमध्ये प्रदूषण दाखवत असून ते मध्यम स्वरूपाचे प्रदूषण आहे. समुद्रावरील हवेचा वेग घसरल्याने हवेतील प्रदूषणकारी घटक एकाच ठिकाणी रेंगाळत राहत आहेत.

मुंबईच्या हवेतील प्रदूषणाचा आलेख वाढवण्यास मुख्यत्वे वाहनांतून बाहेर पडणारा धूर कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील हवेत नायट्रोजन ऑक्साइड्सचे (नायट्रिक ऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइड) यांचे प्रमाण वाढले आहे. या रसायनाचा हवेतील बाष्प किंवा पाण्याशी संयोग झाला तर त्यातून आम्ल तयार होते तसेच हे कण श्वसनावाटे शरीरात गेल्यास श्वसननलिकादाह (ब्रॉन्कायटिस) होऊ शकतो. त्याचप्रमाणे पीएम २.५ (२.५ मायक्रोमीटर व्यासाहून लहान धूलिकण- मानवी केसांपेक्षा शंभर पट कमी व्यासाचे) यांचेही हवेतील प्रमाण चिंताजनक आहे. या कणांमुळे फुप्फुसाच्या कर्करोगापर्यंत अपाय होऊ शकतात.

प्रतवारी (एअर क्वालिटी इंडेक्स) कशी मोजतात..

वांद्रे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केंद्रामध्ये धूलिकण (पीएम १० तसेच पीएम २.५), सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन आणि अमोनियाचे प्रमाण मोजण्यात येते. एका घनमीटर हवेतील या घटकांचे २४ तासांमधील सरासरी प्रमाण काढल्यावर हवेची उत्तम, समाधानकारक, मध्यम, वाईट, अत्यंत वाईट आणि धोकादायक अशी प्रतवारी केली जाते. उत्तम हवा आरोग्यासाठी अर्थातच चांगली असते. समाधानकारक हवेत अतिसंवेदनशील व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मध्यम हवेत फुप्फुस तसेच हृदयाचा विकार असलेल्यांना तसेच लहान मुलांना व वृद्धांना श्वास घेण्यात अडचणी येतात. वाईट हवा सर्वासाठीच त्रासदायक ठरते, तर अत्यंत वाईट हवेमुळे दीर्घकालीन श्वसनविकार होऊ शकतात. धोकादायक हवेत निरोगी व्यक्तींवरही परिणाम दिसू लागतात