संकेतस्थळांवरून ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव

राज्य सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे भाजी बाजारात भाज्यांची टंचाई जाणवू लागली आणि भाज्यांचे दर गगनाला भिडले. या संपाचा फटका असेल किंवा भाज्यांच्या उत्पानातील घट असेल, विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचा दर चढाचा आहे तो आणखी काही काळ असाचा राहणार असल्याची वर्दी लागताच ऑनलाइन भाजी बाजारात ऑफर्सनी गर्दी केली. इतकेच नव्हे तर इतरवेळी भाजी विक्रेत्याशी भाजीच्या दर्जा आणि दराबाबत वादावादी करणाऱ्या गृहिणींनीही आपला मोर्चा ऑनलाइन भाजी बाजाराकडे वळविल्यामुळे गेल्या १५ दिवसांत तेथील ग्राहकांच्या संख्येत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मोबाइलपासून किराणामालापर्यंत सर्व गोष्टी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणाऱ्या ऑनलाइन बाजारात गेल्या वर्षभरापासून भाज्या आणि फळांनीही हजेरी लावली. शेतकऱ्यांना अपेक्षित दर देऊन आलेल्या मालाची त्याच्या दर्जानुसार विभागणी करून बाजारभावापेक्षा १० ते २० टक्के कमी किमतीत ते ऑनलाइन मंडईत मांडले जातात. पण भाजी घ्यायची म्हणजे गृहिणी ती हातात घेऊन चहूकडून न्याहाळून पाहिल्याशिवाय आपल्या पिशवीत स्थान देत नाहीत. अशा गृहिणींना या मंडईकडे वळविण्यासाठी विविध संकेतस्थळावर ऑफर्स देऊ केल्या आहेत. यामध्ये रुपये ४९९ची खरेदी केल्यावर एक किलो कांदा मोफत, रुपये ९९९ रुपयांची खरेदी केल्यावर एक किलो टोमॅटो मोफत, रुपये ६९९ रुपयांची खरेदी केल्यावर एक रुपये किलोने मक्याचे कणीस, रुपये पाचशेच्या वरील खरेदीवर पाच टक्के सवलत अशा विविध आणि नावीन्यपूर्ण ऑफर्सचा समावेश आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारापेक्षा कमी दर देणे, याचबरोबर ऑफर्स देणे यात नुकसान होत असले तरी ग्राहकांनी या बाजाराकडे वळावे या उद्देशाने तोटा गृहीत धरूनच आमचे अर्थनियोजन केले जात असल्याचे ‘वेजीस डॉट को डॉट इन’ या संकेतस्थळाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तर ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या भाज्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांकडून भाज्या आणल्यावर विविध टप्पे पार पाडत चांगल्या दर्जाच्या भाज्या उपलब्ध करून देतो. याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या दारात भाजी गेल्यावर ती हाताळून पाहण्याची सोयही ऑनलाइन बाजारात उपलब्ध असल्याचे ‘गो४फ्रेश डॉट इन’ या संकेतस्थळाचे विपणन प्रमुख कुणाल परमार यांनी सांगितले. जर ग्राहकांना भाजी पसंत नाही पडली तर ती परत पाठविण्याचाही अधिकार त्यांच्याकडे असल्याचे परमार यांनी नमूद केले. गेल्या पंधरा दिवसांत ऑनलाइन भाजी बाजारातील ग्राहकसंख्या पाच ते दहा टक्क्यांनी वाढली असून ती तात्पुरती असल्याचेही परमार म्हणाले.