सर्वसामन्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱया केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. मागील वर्षी उघडकीस आलेल्या केबीसी घोटाळ्याने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना झळ सोसावी लागली. सुमारे अडीचशे कोटींच्या या घोटाळ्याने सारेच चक्रावले होते. जामीनावर सुटल्यानंतर भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नीने सिंगापूर गाठले होते. त्यानंतर आज भाऊसाहेब सिंगापूरहून मुंबईला परतत असता विमानतळावरच पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्याचा तपास नाशिक पोलिसांनीच करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे नाशिक पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. केबीसी प्रकरणाचे दोषारोपपत्र नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अण्वेषण शाखेने सादर केले होते. मात्र, त्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते. पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी नाशिक पोलिसांनी केली असून, आरोपपत्र देखील नाशिक पोलिसांनीच सादर केले असल्याने प्रकरणाचा तपास त्यांनीच करावा, असे न्यायालयाने आदेश दिले होते.