‘जन्मदिन की स्मृतिदिन’ या अग्रलेखावर आपली भूमिका मांडणारी पुण्यातील जीसीओईएआरए महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता चेचर ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तर अमरावतीतील जी.व्ही.आय.एस.एच. महाविद्यालयाचा विद्यार्थी आशीष कांबळे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला केलेल्या निश्चलनीकरणानंतर आर्थिक गणित बदलले आणि अर्थव्यवस्था जायबंदी झाली. याचे सांगोपांग विवेचन या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्राजक्ता आणि आशीष यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. प्राजक्ताला सात हजार आणि प्रमाणपत्र तर आशीषला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षणतज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते.

असे सहभागी व्हा..

या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.