नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सैराट सिनेमाची आठवण करुन देणारी घटना मालवणी परिसरात घडली आहे. या घटनेत भावजयीला ठार मारणाऱ्या दिरासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
९ जानेवारी २०१६ रोजी मालवणी पोलिसांना माहिती मिळाली की, धारवली गावाकडे जाणाऱ्या रस्ताच्या शेजारी एका गोणीतून किडे बाहेर येत असून सर्वत्र दरुगधी पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोणी उघडली असता, एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. निर्वस्त्र असलेल्या या महिलेच्या डोक्यात जखमा होत्या, तसेच गळा आवळल्याच्या खूणा होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील पोलिस ठाण्यात महिला हरवल्याची काही नोंद आहे का, याचा शोध घेण्यात येत होता. मालवणी परिसरातील एका विवाहितेच्या हरविल्याची तक्रार दाखल असल्याने आझाद कुरेशी याला पोलिसांनी आणून मृतदेह दाखवला, पण हा मृतदेह आपली पत्नी रुबी हिचा नसल्याचे आझादने सांगितले आणि पोलिसांनी इतरत्र शोध घेण्यास सुरुवात केली.
मालवणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेशकुमार ठाकूर आणि उपनिरीक्षक संदीप पांचागणे यांना माहिती मिळाली की, आंबोजवाडी परिसरातून एका महिलेचे कुटुंबीय अचानक राहते घर सोडून उत्तर प्रदेशात निघून गेले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. तेव्हा हे कुटुंब म्हणजे रुबीचेच आईवडिल असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी रुबीच्या आईला बोलावून मृतदेह दाखवला, असता क्षणार्धात तिने मुलीचा मृतदेह ओळखला. अडीच वर्षांचे मूल असलेली, बेताची परिस्थिती असलेल्या रुबीची हत्या कोणी व का केली असावी, या प्रश्नाने मालवणी पोलिसांना भंडावून सोडले होते. रूबीचा दीर मोहम्मद रईस याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. बहिणीचा नवरा मोहम्मद इसाक आणि मित्र शब्बीर यांच्यासाथीने ही हत्या केल्याचे मान्य केले.

दुसऱ्या समाजाची असल्याने हत्या
रईसने ही हत्या का केली, याची चौकशी मालवणी पोलीस करत होते, तेव्हा रईसने सांगितलेल्या कारणाने त्यांनाही हादरा बसला. आझाद आणि रूबी यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण, त्याला आझादचा मोठा भाऊ असलेल्या रईसचा टोकाचा विरोध होता. रूबी एकाच धर्माची असली तरी वेगळा समाजाची असल्याने रईसचा त्याला विरोध होता. विरोधाला न जुमानता आझाद-रुबी यांनी दिल्लीला जाऊन लग्न केले. त्यानंतर, सर्व काही आलबेल होईल, असे आझादला वाटले. पण, रईसच्या मनात तो राग धुमसत होता. त्याने इसाक-शब्बीरच्या साथीने ३ जानेवारीच्या दुपारी रूबीची गळा दाबून हत्या केली, वीट डोक्यात मारुन तीची हत्या केली. तरीही समाधान न झालेल्या रईसने मृत रूबीवर बलात्कार केला. मग गोणीत पुरुन तिचा मृतदेह खाडीत फेकून दिला.