मेट्रोमार्गावर दिवसभरात १०,१९७ प्रवाशांचा प्रवास

मुंबई : जवळपास सात महिने ठप्प असलेली घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारपासून सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी मेट्रोला कमी प्रतिसाद मिळाला. दिवसभरात १०,१९७ प्रवाशांनी प्रवास केला.

टाळेबंदीत बंद के लेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि आरोग्य सुरक्षेच्या विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून सर्व मुंबईकरांसाठी कार्यरत झाली.

करोनापूर्व काळात मेट्रोमधून दर दिवशी चार ते साडेचार लाख प्रवासी प्रवास करीत होते. खचाखच भरलेल्या मेट्रो रेल्वे गाडीचे सोमवारचे चित्र मात्र एकदम वेगळे होते. स्थानकात तिकीट खिडक्या आणि सुरक्षा चौकटींवर दिसणाऱ्या लांबच लांब रांगा या वेळी कोठेच दिसल्या नाहीत. उलट मर्यादित प्रवेशद्वारांचा वापर आणि प्रवाशांसाठी आखून दिलेली बंदिस्त मार्गिका यांमुळे स्थानकात इतरत्र फिरणारे प्रवासीही दिसत नव्हते.

नव्या नियमांनुसार मेट्रो रेल्वे गाडीतून १०० प्रवासी बसून आणि २६० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. पण पहिल्या दिवशी सर्व उपलब्ध आसनेदेखील संपूर्णपणे व्यापलेली दिसली नाहीत. प्रस्तुत प्रतिनिधीने या मार्गिकेवर दोन फेऱ्या प्रवास केला असता, सुमारे ५० प्रवासी एका वेळी प्रवास करताना आढळले.

मेट्रो-१ ही अंधेरी आणि घाटकोपर या दोन महत्त्वाच्या उपनगरी रेल्वे स्थानकांना जोडलेली असल्याने या मार्गिकेवर कायमच गर्दी असते. पण सध्या उपनगरी रेल्वेचा वापर सर्व प्रवाशांना करता येत नसल्यामुळेही मेट्रो मार्गिकेच्या प्रवासी संख्येवर सोमवारी परिणाम झाल्याचे दिसून आले.

तापमान आणि मुखपट्टी तपासूनच प्रवेश दिला जात होता. तिकिटासाठी क्यूआर कोडचा पर्याय असला तरी तो न वापरणाऱ्यांना तिकीट खिडकीवर कागदी तिकीट दिले जात होते. तसेच क्यूआर कोडचा वापर करणाऱ्यांची संख्या पहिल्या दिवशी तुरळक असल्याचे दिसले. सध्या या मार्गिकेवर साडेसहा ते आठ मिनिटांच्या वारंवारितेनुसार दिवसाला २०० फेऱ्या होतील.

रिचार्ज, नूतनीकरणास प्रतिसाद

२२ मार्चपासून मेट्रो सुविधा बंद असल्याने दरम्यानच्या काळात पास तसेच स्मार्टकार्डवरील शिल्लक रकमेची मुदत वाढवून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अंधेरी स्थानकात या खिडकीवर सुमारे १०० हून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे आढळले.

१८३ फेऱ्या पूर्ण

’ पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत मेट्रोच्या एकूण १८३ फेऱ्या पूर्ण झाल्या.

’ यामध्ये एकूण १० हजार १९७ प्रवाशांनी प्रवास केला.

’ करोनापूर्व काळात एका दिवसात सुमारे ३५० ते ४०० फे ऱ्यांमध्ये चार ते साडेचार लाख प्रवासी मेट्रोवर प्रवास करत.

’ मेट्रो सुविधा सकाळी ८.३० ते रात्री ८.३० दरम्यान सुरू असेल.