पळून जाऊन दुसरा विवाह करणाऱ्या एका महिलेने आपल्याच मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. मात्र मुलीने आरडाओरड केल्यामुळे आसपासच्या नागरिकांनी तिला आणि तिच्या साथीदाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मालाड पश्चिमेच्या मार्वे परिसरात राहणारी किरण उर्फ शेहनाझ शेख (३५) ही विवाहित महिला दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये पळून गेली होती. तेथे तिने दुसरा विवाहही केला होता. आपल्या १२ वर्षांच्या मुलीला घेऊन जाण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ती मार्वे परिसरात आली होती. मुलीसोबत तिची चुलत बहीण होती. या दोघीही शाळेतून घरी परतत असताना किरणने  आपल्या मुलीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेल्या मुलींनी आरडाओरड करताच आसपासच्या नागरिकांनी किरण आणि तिच्यासोबत असलेल्या रेहमान शेख (३८) यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.