प्रवेश प्रक्रिया नव्या तत्त्वानुसार; ३०८३ विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना अकरावीच्या खास फेरीनंतरही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येत्या २१ ऑगस्टपासून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे तीन गट केले आहेत. प्रत्येक गटाला दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांला महाविद्यालयातील रिक्त जागांनुसार प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. अकरावीच्या खास फेरीमध्ये १९,३३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले होते. त्यापैकी १६,२५३ विद्यार्थ्यांचे नाव जागा वाटप यादीमध्ये आले होते. या फेरीमध्ये अर्ज केलेल्या ३०८३ विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही महाविद्यालय मिळालेले नाही. खास फेरीमध्ये प्रवेश न घेतलेल्या आणि कोणतेही महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २८ ऑगस्ट या काळात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे तीन गटांत विभाजन केले आहे. ८० ते १०० टक्के गुण असणारे विद्यार्थी गट क्रमांक ‘१’, ६० ते १०० टक्के गुण असणारे विद्यार्थी गट क्रमांक ‘२’ आणि १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी गट क्रमांक ‘३’मध्ये असणार आहेत. ही फेरी सुरू होण्यापूर्वी २० ऑगस्टला महाविद्यालयातील उर्वरित जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानुसार गट क्रमांक १ म्हणजेच ८० ते १०० टक्क्यांदरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २१ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर लॉग इन करून भाग २ मध्ये त्यांना हवे असलेल्या आणि रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयाची निवड करायची आहे. महाविद्यालयाची निवड केल्यानंतर त्यासमोरील (Apply Now) नावाची कळ दाबून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशाची संगणकीकृत पावती स्क्रीनवर दिसल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित झाल्याचे विद्यार्थ्यांनी समजावे. ही संगणकीकृत पावती घेऊनच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याचप्रकारे उर्वरित दोन्ही गटांची प्रवेशप्रक्रिया दिलेल्या मुदतीमध्ये राबविण्यात येणार आहे. सदर प्रक्रियेमध्ये एकाच वेळी अनेक विद्यार्थी लॉग इन करणे, एकाच महाविद्यालयासाठी एका वेळी अनेक विद्यार्थी प्रयत्नात असणे यामुळे तांत्रिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जागा उपलब्ध नाही असा संदेश आल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणेच नवीन महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक २० ऑगस्ट - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध २१ ऑगस्ट - गट क्रमांक १ (८० ते १०० टक्के गुण असणारे)मधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे २१ ऑगस्ट (सकाळी ११ ते ५) आणि २२ ऑगस्ट (सकाळी ११ ते १) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे २२ ऑगस्ट - सायंकाळी ५ वाजता - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध २३ ऑगस्ट - गट क्रमांक २ (६० ते १०० टक्के गुण असणारे)मधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे २३ ऑगस्ट (सकाळी ११ ते ५) आणि २४ ऑगस्ट (सकाळी ११ ते १) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे. २४ ऑगस्ट - सायंकाळी ५ वाजता - रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध २६ ऑगस्ट - गट क्रमांक २(६० ते १०० टक्के गुण असणारे)मधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे २६ ऑगस्ट (सकाळी ११ ते ५) आणि २८ ऑगस्ट (सकाळी ११ ते १) - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे. महत्त्वाच्या सूचना रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयाची निवड करणे. शाखेनुसार महाविद्यालयाचा यु-डायस क्रमांक, कॉलेजचा सांकेतिक क्रमांक, महाविद्यालयाचे नाव, विनाअनुदानित, अनुदानित आदी गोष्टींचा तपशील नीट तपासणे. ऑनलाइन प्रवेश निश्चित झाल्याची संगणकीकृत पावतीची प्रिंट काढणे संगणकीकृत पावती घेऊनच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जाणे.