पश्चिम रेल्वेमार्गावर बुधवारी सकाळी अंधेरी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अंधेरी स्थानकातील सिग्नल पॅनलला रिलायन्स कंपनीतर्फे वीजपुरठा होतो. हा वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे जोगेश्वरी आणि अंधेरीच्या दरम्यान गांडयांची रांग लागली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालये गाठण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, रेल्वेने टाटा कंपनीकडून तात्पुरता वीजपुरवठा घेतला असून अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. परंतु वाहतूक पूर्ववत होण्यासाठी नक्की किती वेळ लागेल, याबद्दल प्रशासनातर्फे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.