उस्मानाबादच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांना २०१४ मधील लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने शोभा राऊतला दोन वेगवेगळ्या प्रकरणात ८ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. फळझाडे व दगडाच्या मावेजाचा धनादेश देण्यासाठी सात शेतकर्यांकडून ३९ हजार २०० रुपयांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाच देण्यासाठी शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले होते, हा मुद्दाही कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आला होता. उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने महसूल अधिकारी शोभा राऊतला दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी चार वर्षे अशी एकूण आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण एकाच वेळी दोन्ही शिक्षा भोगायच्या असल्याने राऊतला चार वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन्ही कलमांखाली मिळून ५० हजार दंड ठोठावण्यात आला आहे. कौडगाव (ता. उस्मानाबाद) येथील एमआयडीसीसाठी मोठ्याप्रमाणात जमीनी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये कौडगाव येथील कांही शेतकर्यांच्या जमिनीवरील फळझाडांचाही मावेजा शासनाकडून येणे बाकी होता. त्यानुसार मावेजा मंजूर झाल्यानंतर सदरील रकमेचे धनादेश देण्यासाठी उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याची तक्रार उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. कौडगाव येथील सात शेतकर्यांचे फळझाडे मावेजापोटी जवळपास ८ लाख रुपये येणे होते. या रक्कमेच्या पाच टक्क्यांप्रमाणे सात जणांकडून ३९ हजार २०० रुपये घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, लाच घेताना पकडण्यात आलेल्या उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्या हिंगोली येथील स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेच्या बचत खात्यात ३० लाख १५ हजार रुपये, तर चाळीस हजारांची ठेव आढळून आले होते. उस्मानाबाद येथे येण्यापूर्वी त्या हिंगोली येथे भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. हिंगोली येथे तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांची परभणी येथे बदली झाली होती.