तुरुंगात २८ दिवस काढल्यानंतर अखेर काल बुधवारी भायखळा जेलमधून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुटका झाली. मुंबई उच्च न्यायालयाने रियाला सर्शन जामीन मंजूर केला. पण तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने योगाची मदत घेतली तसेच तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी सांगितले. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

“तुरुंगात असताना रियाने स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असे सतीश मानशिंदे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी तिचा बराच पिच्छा पुरवला होता. त्यामुळेच बऱ्याच वर्षांनी मी माझ्या अशीलाला पाहण्यासाठी तुरुंगात गेलो. ती कुठल्या स्थितीमध्ये आहे, ते मला पाहायचे होते. मी तिला पाहिले, तिने हिंमत हरलेली नव्हती. तुरुंगात ती स्वत:ची काळजी घेत होती. ती स्वत:साठी आणि इतर कैद्यांसाठी तुरुंगात योगाचे वर्ग घ्यायची. तुरुंगातल्या परिस्थितीशी तिने जुळवून घेतले होते. करोनामुळे तिला घरात बनवलेले जेवण मिळत नव्हते. सामान्य माणसाप्रमाणे ती इतर कैद्यांसोबत राहत होती. परिस्थितीशी तिने लढा दिला. तिच्यावर आरोप करणाऱ्या किंवा तिच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कोणाचाही सामना करण्यास ती आता सज्ज आहे” असे सतीश मानशिंदे यांनी सांगितले.

रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”.