रोकडविरहित व्यवहारामुळे सहली ‘फुल्ल’ निश्चलनीकरणाचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला असला तरी हा निर्णय पर्यटन क्षेत्राच्या पथ्यावर पडला आहे. नोटाबंदीमुळे रोकडविरहित व्यवहारांना प्राधान्य मिळाले आहे. पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग आणि व्यवहार केल्याने पर्यटक व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट या निर्णयाचे पर्यटन व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. ‘चलनतुटवडय़ामुळे आमच्या बुकिंगवर काहीही परिणाम झालेला नाही. डिसेंबर महिन्यातील सर्व सहली हाऊसफुल्ल आहेत,’ असे ‘केसरी टूर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. आमच्या अनेक सहली ‘कॅरी झीरो मनी’ संकल्पनेत राबवलेल्या असल्याने एकदा बुकिंगची रक्कम पूर्ण भरल्यानंतर पर्यटकांना सहलीवर असताना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. याशिवाय, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम भरायची असल्यास पर्यटकांकडून त्यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड घेऊन त्याची रितसर नोंद क रायची व्यवस्थाही आधीपासून असल्याने पर्यटकांना आणि कंपन्यांनाही या निर्णयाचा कुठल्याच प्रकारे फटका बसलेला नाही. उलट, आता अनेक पर्यटक रोकडविरहित व्यवहार करत असल्याने रोखपाल विभागावरचा कामाचा बोजा कमी झाला आहे, असे ते म्हणाले. ‘खरेदीला फटका’ सुरुवातीला पर्यटकांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा संपवण्यासाठी बुकिं गचा पर्याय स्वीकारला होता. आम्हालाही त्यांच्याकडून पैसे घेऊन रेल्वे तिकीट आरक्षण, बस आरक्षण करायचे असल्याने त्यावेळी जुन्या नोटा घेतल्या म्हणून त्रास झाला नाही, असे ‘ट्रॅव्हलर्स स्टुडिओ ’चे गिरीश सावंत यांनी सांगितले. टूरवर गेल्यानंतर पर्यटकांनीही ज्या हॉटेलमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातात, तिथेच राहणे पसंत केले. मात्र जिथे छोटय़ा छोटय़ा दुकानदारांकडे कार्ड स्वीकारले जात नाहीत, त्यांच्याकडे पर्यटकांना खरेदी करता आली नाही. पर्यटकांच्या खरेदीला थोडासा फटका बसल्याचे सावंत म्हणाले. पर्यटन व्यवसायावर असंघटित क्षेत्रातील लोकांची मक्तेदारी आहे. सरकारच्या या निर्णयामुळे असंघटित क्षेत्राचे व्यवहारही बँकेच्या नियंत्रणाखाली आले असून या व्यवसायाला एक आर्थिक शिस्त लागण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरले आहे. - अनिल खंडेलवाल, मुख्य वित्त अधिकारी, कॉक्स अँड किंग्ज