मुंबई गुंतवणूकदारांमध्ये जागृती व मार्गदर्शनाच्या ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ या उपक्रमाअंतर्गत गुरुवार, १४ जुलै रोजी मुलुंडकरांना तज्ज्ञांशी हितगुजाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सेवा संघ मराठी मंडळ, अपना बाजारशेजारी, मुलुंड (प.) येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम योजण्यात आला आहे. ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ हे व्यासपीठ प्रत्येकाने जीवनात ठरविलेल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेचा गुंतवणूकमंत्र ठरले आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या प्रचलित म्हणीप्रमाणे गुंतवणुकीचे मोठय़ा कालावधीसाठी सातत्य राखल्यास इच्छित संपत्तीनिर्मिती कुणालाही शक्य आहे. कमावत्या वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बचतीचे महत्त्व आणि मोठय़ा कालावधीसाठी गुंतवणुकीचे लाभ यासह जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजनाचे महत्त्व या विषयावर मिलिंद अंध्रुटकर, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे या विषयावर वसंत माधव कुलकर्णी हे तज्ज्ञ सल्लागार या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील. श्रोत्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांना प्रश्न विचारून आपल्या गुंतवणूक निर्णयांविषयी समाधानही करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. गुणीजान महोत्सव राजे महाराजे किंवा संस्थानिकांच्या काळात दरबारामध्ये नृत्य, संगीत, गायन यांच्या मैफली होत असत. या कलांना राजाश्रय होता. रसिक श्रोत्यांसमोर कलाकार आपली कला सादर करत असत. काळाच्या ओघात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या काही संस्था शास्त्रीय संगीताच्या बैठकांचे किंवा महोत्सवांचे आयोजन करत आहेत. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या श्रोत्यांकडून या मैफलींना चांगला प्रतिसादही मिळत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे दरवर्षी ‘गुणीजान’ समारोहाचे आयोजन केले जाते. ‘गुणीजान’ हे प्रख्यात गायक दिवंगत पं. सी. आर. व्यास यांचे टोपणनाव आहे. ज्येष्ठ पत्रकार व नाटककार विद्याधर गोखले यांच्या सहकार्याने महाराष्ट्र ललित कला निधीची स्थापना करण्यात आली होती. मे २००६ मध्ये मुंबईत गुणीजान बैठकीला सुरुवात झाली. यंदाच्या गुणीजान बैठकीत शास्त्रीय गायिका मंजुश्री सोमण व विराज अमर या सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’चे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. कधी- शुक्रवार, ८ जुलै २०१६. कुठे- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर सभागृह, चौथा मजला, मंत्रालयासमोर, नरिमन पॉइंट. ’ केव्हा- सायंकाळी साडेसहा वाजता. एनसीपीएचा ‘बंदिश’ महोत्सव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील गायन आणि वादनात ‘बंदिश’ या प्रकाराला विशेष महत्त्व आहे. ही बंदिश विशिष्ट रागात बांधलेली असते. बंदिश गाताना त्याला तबला, पखवाज, सारंगी, व्हायोलिन व संवादिनी यांची साथ मिळाली की त्या मैफलीला अधिक बहार येते. शास्त्रीय संगीतातील अनेक घराण्यांच्या बंदिशी प्रसिद्ध असून त्या त्या घराण्याच्या दिग्गज गायकांनी या बंदिशी गायल्या आहेत. रागाचा विस्तार करण्यासाठीही या बंदिशी मार्गदर्शक ठरतात. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट अर्थात ‘एनसीपीए’ने तीन दिवसांच्या ‘बंदिश’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. विविध संगीतकारांनी दिलेल्या योगदानाला या कार्यक्रमातून सांगीतिक आदरांजली वाहिली जाणार आहे. व्यंकटेश कुमार, अजय चक्रवर्ती हे वेगवेगळ्या घराण्यांच्या काही बंदिशी सादर करणार आहेत. पार्थिव गोहिल हे संगीतकार रोशन, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन यांनी विविध रागांवर आधारित संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपट गीते तर प्रसिद्ध गायक हरिहरन हे मिर्झा गालिब व मीर टकी मीर यांच्या गझला सादर करणार आहेत. कधी- शुक्रवार ८ ते रविवार १० जुलै २०१६. कुठे- टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट. केव्हा- सायंकाळी साडेसहा वाजता मराठीमधील उत्तमोत्तम कविता विंदा कंरदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम करून मराठी कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पु.ल. आणि सुनीता देशपांडे यांनीही कवीवर्य बा. भ. बोरकर यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमातून बोरकर यांच्या कविता सादर केल्या. बा. सी. मर्ढेकर यांच्या कविता ज्येष्ठ गायक व संगीतकार यांनी संगीतबद्ध करून लोकांपुढे आणल्या. गायक विनायक जोशी, रंजना पेठे-जोगळेकर व संगीतकार उदय चितळे हेही मराठीतील अभिजात कविता कार्यक्रमातून सादर करतात. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रा. विसुभाऊ बापट यांनीही या कविता महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचविल्या. मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘अमृताचा वसा’ या कार्यक्रमातून मराठी कविता रसिकोंपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. मराठी कवितांवरील या संगीतमय कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे, मधुरा कुंभार-सोरप, जयदीप बगवाडकर, हन्सिका अय्यर हे सहभागी होणार असून अभिनेते सुनील बर्वे व अभिनेत्री स्पृहा जोशी हे काही निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांनी या कविता संगीतबद्ध केल्या आहेत. कधी- शुक्रवार, ८ जुलै २०१६. कुठे- यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा रोड रेल्वे स्थानक (पश्चिम रेल्वे), दादर (पश्चिम). केव्हा- रात्री आठ वाजता. चिमुकल्यांसाठी नृत्यह्ण‘बनियान ट्री’च्या वतीने लहान मुलांसाठी कथा आधारित नृत्य, गाणी आणि भातुकलीचा खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जंगलातील प्राण्यांची माहिती दिली जाईल. तसेच राजस्थानी भातुकली, लोककथाही सांगितल्या जाणार आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या शाळेतील मुलांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. कधी- १० जुलै. कुठे- सेंट अॅण्ड्रूज सभागृह, वांद्रे. वेळ- सकाळी ११.३० ते दुपारी १. ‘नजर ना लग जाए’ हिंदी चित्रपट संगीतात ‘गिटार’ या वाद्याचा वापर अनेक संगीतकारांनी केला आहे. ‘गिटार’ वाद्याचा वापर असलेली अनेक हिंदी गाणी लोकप्रिय आहेत. ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘पापा कहते है बडा नाम करेगा’, ‘एक हसीना थी, एक दिवाना था’, ‘निले निले अंबर पर चाँद जब छा जाए’ ही आणि अशी अनेक गिटार वाद्याचा सहभाग असलेली गाणी लोकप्रिय आहेत. गिटार वाद्याचा वापर असलेल्या हिंदी गाण्यांच्या स्मरण रंजनाचा आनंद ‘नजर ना लग जाए’ या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. गोरख शर्मा हे गिटारवर साथ करणार असून गौरी कवी, सर्वेश मिश्रा, गौतमी, गणेश पाटील, प्रियांका मित्र हे गायक कलाकार ही गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना हेमंतकुमार महाले यांची असून संगीत संयोजन अरविंद हसबनीस यांचे आहे. काही विशेष निमंत्रित गायकही कार्यक्रमात गाणी सादर करणार आहेत. कधी- रविवार, १० जुलै २०१६. कुठे- रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम). केव्हा- दुपारी चार वाजता.