नेरुळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शनिवारी संध्याकाळी सुमारे 200 मुलं आणि त्यांचे पालक मोठ्या आनंदात दिसत होते. हसणं-खिदळण, धावणं-बागडण, सर्वांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय? विशेष हेच की, ही सर्व मुलंच 'विशेष' होती. ऑटिझम-स्वमग्नता हा विकार जन्मतः असलेली ही मुलं आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात ही आगळीवेगळी-आनंदी संध्याकाळ आणली होती, नवी मुंबईतल्या 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'च्या डॉ. सुमीत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱयांनी. स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक जन्मस्थ अवस्था आहे. अशी व्यक्ती-मुलं आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. ऑटिझमबाबत जनजागरूकता आणि सर्वांगीण उपचार करणाऱ्या 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर' या संस्थेने ऑटिझमग्रस्त मुलांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी अनेक नवनव्या थेरपींचा अवलंब केला आहे. याअंतर्गत शनिवारी सुमारे 200 स्वमग्न मुलांना डॉ. आंबेडकर उद्यानात ग्रुप थेरपी दिली गेली. अशा "ग्रुप थेरपीमुळे या मुलांच्या मनातील भीती चेपून त्यांच्यात समाजात, लोकांमध्ये मिसळण्याची आणि संवाद साधण्याची कौशल्ये विकसित होण्यास मदत होते" असं 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'चे संस्थापक डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं. ऑटिझमग्रस्त मुलांना समाजात मिसळताना असंख्य अडचणी येतात. अनाकलनीय चिंता, नकारात्मक वर्तवणूक, असंतुलित सामाजिक व्यवहार आणि संवाद साधता न येणे या त्यांच्या प्रमुख अडचणी असतात. त्यामुळेच अशा मुलांच्या पालकांना मुलांना घेऊन सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे किंवा मॉल, बागा, उद्यान यांसारख्या सामाजिक ठिकाणी जाणे अवघड होऊन बसते. अशा मुलांसाठी चार भिंतींआडचं समुपदेशन पुरेसं नसून त्यांच्यासाठी ग्रुप थेरपी म्हणजे गटात किंवा समूहात केली जाणारी उपचारपद्धती उपयुक्त ठरते, अशी माहिती डॉ. सुमीत शिंदे यांनी दिली. दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2009मध्ये 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'ने स्वमग्न मुलांना उद्यानामध्ये ग्रुप थेरपी देण्यास सुरुवात केली. तेव्हा फक्त 2 मुलं सहभागी झाली होती. "आज या ग्रुप थेरपीची उपयुक्ततता समजल्यामुळे 200 स्वमग्न मुलं आणि त्यांचे पालक या उपक्रमात सहभागी झाले. गेल्या दहा वर्षांत आम्ही नेरुळ, कोपरखैरणे, खारघर, चेंबूर आणि सायन येथील आमच्या शाखांमध्ये ग्रुप थेरपीच्या 1500 हून अधिक कार्यशाळा घेतल्या", अशी माहिती 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'चे व्यवस्थापक सुशांत शिंदे यांनी दिली. - ग्रुप थेरपीचा नेमका फायदा काय ? ऑटिझमग्रस्त- स्वमग्न मुलांना इंद्रियानुभवांच्या एकत्रिकरणातील गडबडीमुळे समाजात- लोकांमध्ये कसं मिसळायचं याचं भान नसतं. ग्रुप थेरपीमुळे त्यांना हे समजतं आणि लोकांशी संवाद साधण्याचा आत्मविश्वास येतो. चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं की, "अनेक पालक आम्हाला सांगतात की, ग्रुप थेरपीमुळे आज अनेक वर्षांनंतर ते त्यांच्या स्वमग्न मुलाला घेऊन सिनेमाला जाऊ शकतात किंवा एखाद्या लग्नाला उपस्थित राहू शकतात." असंतुलित मानसिक व्यवहारांमुळे इतर मुलांना मारणं किंवा सोसायटीच्या तक्रारी येणं, असले प्रकारसुद्धा खूप कमी होतात. ग्रुप थेरपीमुळे स्वमग्न मुलांना बाहेरच्या जगात कसं वावरायचं, तिथले नियम कसे पाळायचे, तसंच आपली वर्तवणूक कशी नियमित करायची, हे समजण्यास खूप मदत होते, असंही डॉ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं.