मुंबई : रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांमुळे मुंबईत विशेषत: मालाड-मालवणी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले.

रामनवमीनिमित्त मालवणी येथील मुस्लीमबहुल परिसरातून काढण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान हेतुत: मशिदीसमोर नमाज सुरू असताना मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजवले जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. आम्ही कोणालाही सार्वजनिक यात्रा काढण्यापासून किंवा सभा घेण्यापासून रोखू शकत नाही. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोणीही नियमांचा भंग केल्यास पोलिसांनी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, नियमांचा भंग होणार नाही, या आश्वासनाच्या आधारे आमदार टी. राजा. सिंह यांना मिरा-भाईंदर येथे सभा आयोजित करण्यास आपण परवानगी दिल्याचे न्यायमूर्ती डेरे यांनी नमूद केले.

हेही वाचा – मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

हेही वाचा – म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण

रामनवमीला काढण्यात येणाऱ्या यात्रांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे का ते पाहा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर, रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रांदरम्यान अनुचित घटना घडणार नाहीत याबाबत पोलीस अधिक सावध राहतील, असे आश्वासन महाधिवक्ता बिरेद्र सराफ यांनी खंडपीठाला दिले.