मुंबई : वारंवार पाहणी करून किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या किंवा त्या अद्ययावत न ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आगीसारख्या आपत्तींसाठी जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून यथोचित कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेकडूनही जबाबदारी निश्चित केली जावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात गगराणी यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन सुमारे तीन तास आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी रविंद्र अंबुलगेकर, अग्निशमन दलाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी अग्निशमन दलाची वाहने, विविध उपकरणे तसेच तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अग्निशमन यंत्र, फायर इंजिन, फोम टेंडर्स, फायर रोबोट, कंट्रोल पोस्ट व्हॅन, फायर बाईक आदींचा समावेश होता.

हेही वाचा…मुंबई : वाढत्या उन्हाचा आठ जणांना त्रास

दरम्यान, त्यांनी फायर इंजिनच्या शिडीच्या साहाय्याने जमिनीपासून सुमारे ९० मीटर उंच अंतरावर जाऊन पाहणी केली. आढावा बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त गगराणी पुढे म्हणाले की, सध्या मुंबई अग्निशमन दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने इमारतींमध्ये अग्निशमनविषयक यंत्रणा आहे किंवा नाही हे यादृच्छिक पद्धतीने तपासले जाते. परंतु, त्यासाठी एखादी प्रणाली दलाने विकसित करावी.

जगभरात होत असलेले नवनवीन प्रयोग, अद्ययावत प्रणाली याविषयीची संशोधनात्मक माहिती गोळा करणारे स्वतंत्र अभ्यासक निर्माण करावे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मोठे योगदान आहे. कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण होईल. अग्निशमन दलात कोणतेही वाहन किंवा तंत्रज्ञान समाविष्ट करताना ते किती अद्ययावत आहे, इतकेच पाहू नये. तर, संकटसमयी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता तपासावी. दुर्घटनांदरम्यान स्वयंसेवक, नागरिकांकडूनही बचावकार्यात मदत होत असते. अशा स्वयंसेवकांचा, नागरिकांचा यथोचित गौरव व्हायला हवा.

हेही वाचा…मुंबई : धारावीतील रंगीबेरंगी मतदान केंद्र ठरले लक्षवेधी

सक्षमतेच्या आधारावर पदोन्नती …..

मुंबई अग्निशमन दलात नुकतेच ४६८ नवीन अग्निशमन जवान रुजू झाले आहेत. लवकरच सुमारे २५० जवानांची नियुक्ती होणार आहे. त्यांना विविध प्रकारच्या संकटाशी लढा देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. आगामी काळात अग्निशमन कर्मचाऱ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी, वजन आणि शरीराची ठेवण यांच्या सक्षमतेच्या आधारावर पदोन्नतीसाठी विचार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मार्गावर ठिकठिकाणी अग्निशमन केंद्रांची निर्मिती करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येईल, असेही गगराणी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc commissioner orders legal action against buildings without up to date fire systems announces mumbai print news psg
Show comments