लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कर्जत येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची कागदपत्रे मुंबई विद्यापीठाकडे वेळेत न दिल्यामुळे निकालानंतर आठ महिन्यांनंतरही विद्यार्थी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत ९ ते १७ मे २०२३ दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल इंजिनीअरिंग) परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन आठ महिने उलटले तरीही विद्यार्थी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना सातव्या व आठव्या अशा दोन्ही सत्राच्या परीक्षेची गुणपत्रिका मिळालेली नाही. या महाविद्यालयाने २०२०-२१ या विद्यार्थ्यांच्या प्रथम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पात्रता कागदपत्रांची वेळेत पूर्तता न केल्यामुळे आणि त्यानंतरचा दंड भरण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे राखीव ठेवली आहेत.

आणखी वाचा-मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या

‘गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राअभावी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते अभियांत्रिकी क्षेत्राव्यतिरिक्त विविध ठिकाणी काम करीत आहेत. त्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या गोंधळामुळे मनस्ताप होतो आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून तात्काळ गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र द्यावे’, असे एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

‘यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. कोणत्याही महाविद्यालयाच्या कामचुकारपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यास महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करावी अथवा फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यानंतर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका द्याव्यात, असा निर्णय २०१८ साली व्यवस्थापन परिषदेमध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार या महाविद्यालयावर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र द्यावे. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही पत्र पाठविण्यात आले आहे’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

आणखी वाचा-जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ

करोना साथीचा फटका

‘आमच्या महाविद्यालयातील एकूण ९६ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने राखीव ठेवलेली आहेत. हे विद्यार्थी प्रथम वर्षाला असतानाच, म्हणजेच २०२० साली आम्ही पात्रता कागदपत्रे जमा करण्यासाठी विद्यापीठात गेलो होतो. परंतु विद्यापीठाने २०१६ पासूनची थकबाकी भरायला सांगितली. त्यानंतर आम्ही विद्यापीठाकडे ४ ते ५ महिन्यांचा वेळ मागितला. करोनाकाळात आमच्या महाविद्यालयाचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले होते. प्रवेशही कमी झाले. त्यामुळे हा दंड आम्ही वेळेत भरू शकलो नाही. आता जानेवारी २०२४ मध्ये पात्रता कागदपत्रे मुंबई विद्यापीठाकडे जमा केली आहेत. तसेच पुढील ५ ते ६ महिन्यांत दंडही भरू. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करून गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे द्यावीत. इतर ७ ते ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या बाबतीतही असेच झाले आहे’, असे यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.

महाविद्यालयाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही संबंधित महाविद्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि पात्रता कागदपत्रे वेळेत जमा केली नाहीत. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेतील निर्णयानुसार तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाला दंड आकारण्यात आला आहे. परंतु त्याकडेही महाविद्यालयाने दुर्लक्ष केले असून त्यामुळे विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे राखीव ठेवण्यात आल्या आहेत. -डॉ. पूजा रौंदळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ