मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून गेल्या तीन महिन्यांत २१ लाख ९२ हजार ४६६ वाहने धावली आहेत. हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिवसाला ७० हजार वाहने धावतील, असा दावा केला होता. पण प्रत्यक्षात दिवसाला २० ते २१ हजार वाहनेच त्यावरून जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने हा २१.८० किमीचा, देशातील सर्वांत लांबीचा सागरी सेतू बांधला. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला करण्यात आले. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी (१३ जानेवारी) सकाळी ८ वाजता हा सागरी सेतू वाहनांसाठी खुला झाला. या सागरी सेतूवरून ताशी १०० किमी वेगाने वाहने धावत असून नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, पुणे या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. असे असले तरी या सागरी सेतूवरून अपेक्षित संख्येने वाहने धावत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : न्यायमूर्ती गौतम पटेल सेवानिवृत्त, औपचारिक प्रथेला फाटा देत अन्य न्यायमूर्तींकडून अनोख्या पद्धतीने निरोप

सागरी सेतूवरून उद्घाटनानंतर महिन्याभरात आठ लाख १३ हजार ७७४ वाहने धावली होती. म्हणजे दिवसाला २७ हजार वाहने त्यावरून धावत होती. आता मात्र त्यात घट झाली आहे. दिवसाला २० ते २१ हजारांच्या दरम्यान वाहने धावत आहेत. १३ जानेवारी ते २१ एप्रिल या तीन महिन्यांत सागरी सेतूवरून केवळ २१ लाख ९२ हजार ४६६ वाहने धावली. त्यांत २१ लाख १० हजार ९९५ मोटारगाड्या, १६ हजार ५६९ मिनी बस, २० हजार ९२१ ट्रक्स किवा बस, १७ हजार ६१४ थ्री एक्सेल वाहने, २६ हजार २६२ फोर- सिक्स एक्सेल वाहने आणि १०५ अतिअवजड वाहने यांचा समावेश आहे. मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर दिवसाला ७० हजार वाहने धावणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हा आकडा सरासरी २१ हजारांच्या पुढे गेलेला नाही.

जादा पथकरामुळे वाहनचालकांची पाठ ?

अटल सेतूवरील पथकर अधिक असल्याने आणि सेतूला जोडणाऱ्या दोन्ही टोकांकडील जोडरस्ते अपूर्ण असल्याने वाहने कमी संख्येने धावत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पथकर कमी करण्याबरोबरच दोन्ही जोडरस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश

एमएमआरडीएला महसूलचिंता

अटल सेतूसाठी ‘जायका’कडून १७ हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले असून २०२८ पासून त्याची परतफेड सुरू होणार आहे. अशावेळी कमी वाहने धावत असल्याने महसूलही कमी मिळत आहे. त्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. पण लवकरच सेतूला जोडणारा शिवडी-वरळी उन्नत रस्ता पूर्ण होईल. तर उलवे आंतरबदल, चिर्ले-कोन जोडरस्ता पूर्ण झाल्यास अटल सेतूवरील प्रतिसाद वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmrda s atal setu sewri nhava sheva sea link low vehicles mumbai print news css