मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने शंभरपेक्षा अधिकवेळा दंड ठोठावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. या कारवायांमुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा संशय असून त्यामुळे स्वत:च्या नावावर नसलेल्या कंपनीद्वारे तो काम करत होता. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
भिंडे १९९८ पासून या व्यवसायात असून त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा महापालिकेने दंड ठोठावला आहे. जाहिरात फलक लावल्याप्रकरणी या दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील चार गुन्हे मुलुंड व दोन गुन्हे सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी सातवा गुन्हा पंतनगर पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला आहे.
हेही वाचा…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकांना सल्ला, मुलांना फास्टफूडऐवजी बाजरीच्या सुपरफूडचा पर्याय
इगो मीडिया या कंपनीचा संचालक होण्यापूर्वी घाटकोपर येथील जाहिरात फलकाची परवानगी या कंपनीला मिळाली होती. पण त्यापूर्वीही भिंडेचे या कंपनीसोबत व्यवहार झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. पोलीस त्याची पडताळणी करत आहेत. भिंडेवर एवढ्या मोठ्याप्रमाणात कारवाई झाल्यामुळे त्याला एकप्रकारे काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यामुळे त्याने दुसऱ्याच्या नावावर कंपनी स्थापन करून हा व्यवहार केल्याचा संशय असून त्याची तपासणी पोलीस करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd