कुटुंबनियोजनासाठी महिलांचा पुढाकार, पुरुषांचा सहभाग नगण्य; महिला नसबंदीचे प्रमाण ४४ टक्के राज्यातील वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देश आणि राष्ट्रीय पातळीवर कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमातील नसबंदी शस्त्रक्रियेत महिलांचा पुढाकार असून मुंबईतील १५ ते ४९ या वयोगटांतील महिला नसबंदीचे प्रमाण ४३.५ टक्के असून पुरुष नसबंदी प्रमाण शून्य टक्के इतके आहे. तर राज्यात महिला नसबंदीचे प्रमाण ४४.८ टक्के असून पुरुष नसबंदीचे प्रमाण फक्त ०.२ टक्के असल्याचे वास्तव पुढे आले आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या २०१५-१६ च्या अहवालात हे वास्तव समोर आले आहे. मुंबईतील पालिका, सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये मोफत पुरुष आणि महिला नसबंदी कार्यक्रम राबविले जात असतानाही पुरुषवर्ग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. पालिकेकडून पुरुषांना नसबंदी कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ११०० आणि राज्य शासनाकडून ३५१ रुपयांचे बक्षीस दिले जाते. तर दारिद्रय़ रेषेखालील स्त्रियांना ६०० आणि दारिद्रय़ रेषेवरील स्त्रियांना २५० रुपयांचे बक्षीस दिले जाते. कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांवर टाकून पुरुष नसबंदीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा कुटुंबनियोजन कार्यक्रमातील डॉक्टरांचा अनुभव आहे. सध्या नसबंदीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे नसबंदी ही सुरक्षित आणि कमी वेळात केली जाऊ शकते. असे असताना सुशिक्षित पुरुषांमध्येही नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल भीतीचे वातावरण आहे. पुरुषांचे समुपदेशन करताना नसबंदी केल्यानंतर लैंगिकदृष्टय़ा असमर्थता येईल, अशा गैरसमजुतीमुळे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करीत नाहीत, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातही महिलांची आघाडी शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिला नसबंदीचे प्रमाण ५५.१ टक्के असून पुरुषांचे प्रमाण ०.७ टक्के इतके आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा अवलंब करीत असल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांची आहे, अशी समज आजही आपल्याकडील पुरुषांच्या मानसिकतेमध्ये आहे. नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जनजागृती कार्यक्रम पुरुषांपर्यंत पोहोचत नाही. महिला मात्र याबाबत पुढाकार घेत सर्व जबाबदारी घेत असतात. त्यामुळे पुरुष याकडे दुर्लक्ष करतात. सध्या पुरुषांमध्ये नसबंदीबाबत जनजागृती आणि समुपदेशनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तर दुसरीकडे निरोध, गर्भनिरोधक औषधे, तांबी यांचे प्रमाण वाढल्यामुळे नसबंदी शस्त्रक्रियेऐवजी पुरुष या गोष्टींचा अवलंब करतात. - डॉ. मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही महिलाची आहे, असे मानून पुरुष मोकळे होतात. नसबंदीमुळे त्यांच्या पुरुषार्थ कमी होईल, अशी समज आजही आपल्या समाजात आहे. पुरुषांनी नसबंदी करावी यासाठी आरोग्य विभागाकडून उपक्रम राबविण्याची गरज आहे. पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया महिलांच्या तुलनेत अतिशय सोपी आहे. तर महिलांना शस्त्रक्रियेनंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागते. मात्र पुरुष नसबंदी कमी होण्यामागे पुरुषी मानसिकता जबाबदार आहे. - किरण मोघे, सामाजिक कार्यकर्ती